27/10/2021
माणूस साक्षर झाला
पण कचरा व्यवस्थापनात
अडाणीच राहिला.
सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन -
घनकचरा ही एक जागतिक समस्या आहे. जसजसे नागरिकरण वाढले तसे कचऱ्याचे प्रमाण व त्यामधील अविघटनशील घटक यांचे प्रमाण वाढले.कचऱ्या मधील प्लास्टिक, काच, रबर, डेब्रिज इ. अविघटनशील घटकामुळे डंपिंग ग्राउंड वरील विघटनशील घटकांचे देखील नैसर्गिक रित्या विघटन होत नाही व त्यामुळे प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण होतात व त्यामधून अहोरात्र विषारी वायू चे उत्सर्जन होत राहते म्हणजेच जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकामध्ये घनकचऱ्या मधून उत्सर्जित होणाऱ्या हरित वायू चा हिस्सा साधारणपणे 4% आहे.
1950 पूर्वीची घनकचरा व्यवस्थापन पद्धत-
पूर्वी दैनंदिन कचऱ्या मध्ये विघटन शील घटकच असायचे. हा कचरा घराजवळ एका उकिरड्या मध्ये संकलित केला जात असे वर्ष भरात तो कचरा पूर्ण कुजून शेतात खत म्हणून टाकला जात असे. म्हणजेच दररोज निर्माण होणारा कचरा हा पूर्णतः विघटनशील असायचा व उकिरड्या मध्ये संकलित केला तरी दर वर्षी तो कुजून शेतीच्या भरण पोषणा साठी उपयुक्त ठरत असे.
अविघटनशील घटक -
यामध्ये भंगार डब्बे, काच व प्लास्टिक च्या बाटल्या,धातू, रब्बर इ. वस्तू वेगळे साठवून भंगार मध्ये विकले जात असत.
जुने कपडे - जुनी कपडे गोधडी शिवण्या साठी वापरली जात असत.
प्लास्टिक चा वापर फारसा नव्हता.
पेपर, पुट्टे कचऱ्यात येण्याजोगा वापर नव्हता.
एकंदर लोकांची क्रयशक्ती फारशी नव्हती त्यामुळे use &throw ही भावना नव्हती.
दाट नागरी भागात ही निर्माण होणाऱ्या कचऱ्या मध्ये विघटनशील घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका जागेवर संकलित होणारा कचरा खत म्हणून उपयुक्त ठरत असे.
1950 नंतर चे घनकचरा व्यवस्थापन -
साधारणपणे 1950 नंतर प्लास्टिक चे प्रमाण झपाट्याने वाढले. कचऱ्यातील विघटनशील घटक कमी झाले प्लास्टिक व अनैसर्गिक घटकामुळे कचरा कुजण्या वर परिणाम झाला. उकिरडे पूर्वी पचन संस्थे प्रमाणे कार्य करत होती त्यांची पचन संस्था धोक्यात आली. त्यातून डंपिंग ग्राउंड चा जन्म झाला व छोटया खेड्या पासून मोठया शहरापर्यत घनकचरा हा विषय जटील बनला. वाद निर्माण होऊ लागले नियोजना साठी मोठया प्रमाणावर खर्च होऊ लागला.
वास्तव -
घनकचरा ही समस्या नसून रोजगाराची संधी आहे. परंतु घरामध्ये कचरा वेगवेगळ्या बीन्स मध्ये ठेवण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजेच प्रक्रिया करणे सुलभ होईल व डंपिंग ग्राउंड निर्माण होणार नाहीत.
भारतामध्ये दररोज 152076 मे. टन एवढा कचरा निर्माण होतो त्यापैकी 55759 मे. टन एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया होते उर्वरित कचरा प्रक्रिया शिवाय डंपिंग ग्राउंड वर टाकला जातो. भारतात आजच्या स्थिती ला 3159 इतकी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची डंपिंग ग्राउंड कचरा मुक्त होण्याची व मोकळा श्वास घेण्याची वाट पाहत आहेत.परंतु प्रत्येक व्यक्ती ला आपले घर स्वच्छ असावे वाटते तसे शहर स्वच्छ राहू शकेल का? डंपिंग ग्राउंड निर्माण होऊच नयेत म्हणून प्रयत्न करता येऊ शकतील का? कचरा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघेल का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत.
त्यासाठी आपणास आपल्या स्वतः पासून सुरुवात करायला हवी. आपली कचरा ठेवायची पद्धत बदलली पाहिजे. आपण एका डस्टबिन मध्ये कचरा ठेवतो तो सार्वजनिक ठिकाणी टाकतो अथवा महानगरपालिका ने सक्ती केल्यास वर्गीकरण करून कचरा घंटागाडी मध्ये टाकतो परंतु एका डस्टबिन मध्ये साठविलेला कचरा पुन्हा वेगळा केला तरी अपेक्षित परिणाम साथता येत नाही. सर्व कचरा एकत्र आल्यानंतर दुर्गंधी युक्त कचरा मूल्यवर्धन योग्य असणाऱ्या कचऱ्याच्या सानिध्यात आल्यावर सर्व कचरा बाधित होतो आणि कचऱ्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो कचरा म्हणजे घाण, दुर्गंधी असाच समज होतो .एकदा कचरा डस्टबिन मध्ये टाकल्या नंतर तो पुन्हा हाताळला जाणार नाही अथवा सर्व कचरा प्लास्टिक च्या पिशवी मध्ये घट्ट बांधून फेकून दिला की आपल्या घरातील कचरा व्यवस्थापन झाले असे आपण समजतो.प्लास्टिक चा अमर्याद वापर व वापरा आणि फेका ही सवय त्यामुळे महासागरा मध्ये देखील सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामूळे परिसर विद्रुप होतोच शिवाय त्यामधून निघणाऱ्या विषारी वायू मूळे परिसर प्रदूषित होतो व परिसंस्था देखील धोक्यात येते.या सर्व पद्धती आपणास बदलणे आवश्यक आहे घरात निर्माण होणारा कचरा वेगवेगळा ठेवण्याची पद्धत अवलंबली पाहिजे वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये 2015 साली 27 प्रकारात घराघरातून कचरा वर्गीकृत करून देण्याची पद्धत विकसित झाली, कर्जत मध्ये 2018 पासून 36 प्रकारात कचरा वर्गीकरण सुरु झाले. माथेरान मध्ये ही हीच संकल्पना आस्तित्वात आली परिणामी या तिन्ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड कचरा मुक्त झाले आहे व भविष्यात येथील डम्पिंग ग्राउंड हे कचरा मुक्तच राहील एवढेच नाही तर येथील डम्पिंग ग्राउंड व कचरा व्यवस्थापन अभ्यासाचा विषय बनले आहे.कल्याण डोंबिवली मध्ये ही हा प्रयोग यशस्वी होत आहे.येथील घनकचरा धनकचरा बनला आहे.देशात अनेक शहरामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजून नागरिकांच्या जीवनशैली चा भाग बनली आहे.
थोडक्यात कचरा ही समस्या नसून राष्ट्रीय साधन संपत्ती चे संवर्धन करण्याची संधी आहे, रोजगाराची संधी आहे. ओल्या कचऱ्यापासून Biogas, Bio CNG, विदयुत निर्मिती, कंपोस्ट खत इ. बाबी निर्माण करू शकतो तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, कागद, काच, रबर, धातू, इ. वेस्ट, कपडे, चपल, बूट इ. घटक रिसायकलिंग साठी उपयोगात आणू शकतो म्हणजेच Reduce, Reuse, Recycle हा मुलमंत्र जपला पाहिजे. तसेच मूळ स्थानी जास्तीत जास्त घटकांमध्ये कचरा विलगीकरण केल्यास कचरा ही समस्या न राहता रोजगाराची संधी असेल आणि कचरा ही जागतिक समस्या असली तरी प्रत्येक व्यक्ती ने सुरुवात आपल्या स्वतः पासून करणे आवश्यक आहे म्हणजेच Think Globally Act Locally
- डॉ.रामदास कोकरे