10/10/2023
*भाग :- 15*
*पुस्तक :- बलुतं*
*लेखक :- दया पवार*
तसं अनेकदा मी आईबरोबर ढग्या डोंगरावर जायचो. त्याची नकटी पायरी चढणं म्हणजे दिव्यच. ढग्या डोंगरावरून दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात यायचा. लांबवर कळसूबाई दिसायची, तर मुळेची धार चांदीच्या रसासारखी लकाकायची. पण ह्या सृष्टि-सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा झाडाची करवंदं तोडून खाण्यातच आम्हाला रस होता.
रात्रीच्या वेळी घरातूनही डोंगराला वणवा लागलेला दिसायचा. अंधारात सरकणारी जळती रेघ. ह्यातील सौंदर्यापेक्षा दुसरेच प्रश्न मला सतावायचे... आता सकाळीच फॉरेस्ट-शिपाई येऊन ठाकरांना धारेवर धरतील; "वणवा तुम्हीच लावला" म्हणून गुन्हा नोंदवतील... उभी झाडं तोडण्यापेक्षा जळालेली लाकडं घेणं हा तसा गुन्हा नव्हता. ठाकर मंडळीच झाडांना वणवा लावतात, जळती लाकडं मिळावीत म्हणून ते ही युक्ती करतात, असाच शिपायांचा समज होता. पण ठाकर हे फारच भाबडे. त्यांना फक्त चार आण्यांचं नाणं ओळखता यायचं. मोळीचा कुणी रुपया दिला, तरी घ्यायचे नाहीत. "व्हते चारी आणे" अशीच साद घालायचे. असे भाबडे ठाकर वणवा पेटवीत असतील ह्यावर विश्वास बसायचा नाही.
ठाकरवाडीत मी केव्हा केव्हा जात असे. घराजवळ आमची थोडीशी शेती होती. आईनं ती जिवापलीकडे जपलेली. रंडकीच्या जमिनी घशात घालणं हा भाऊबंदांचा खेळ. पण आईनं डोळ्यांत तेल घालून तुकड्याचा सांभाळ केलेला. आई गावच्या मराठ्यालासुद्धा जमीन वाट्याने लावत नसे. एक तर मराठा शेतकरी फारच लोभी. “इथं तुहा बाप मेला, इथं तुही आय मेली" म्हणून सारं उत्पन्न हडप करायचा. एक-दोन पायल्या दिल्या तरी मेहेरबानी. पेरणीच्या वेळी वापरलेलं बी-बियाणंही तो सुगीत कापून घेत असे, त्यामुळं आई नेहमीच ठाकराकडे जमीन वाट्यानं लावी. आमचा सरकती ठाकर कमालीचा प्रामाणिक माणूस. सुगीत धान्य झालं म्हणजे घरी म्हारवाड्यात ओझं डोक्यावरून घेऊन यायचा. कडधान्याचा वानवळा आणायला विसरायचा नाही. काही कामानिमित्तानं खळ्यावर मी जायचो. घरापाशीच ठाकरवाडीत त्याचं खळं असायचं. ठाकरवाडी लक्षात राहिली ती तिथल्या कमालीच्या स्वच्छतेमुळं. त्यांची घरं तशी छोटीच; पण खूपच सुबक, वर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या. भिंती लाल मातीनं सारवलेल्या. त्यावर चुन्यानं रंगीबेरंगी नक्षी काढलेली. अंगणही स्वच्छ सारवलेलं. पाण्याचा तांब्याही घासूनपुसून लखलखीत. महारवाड्यात अशी स्वच्छता कधी दिसायची नाही.
स्वच्छता टापटीप सोडली, तर त्यांच्यात अज्ञान भयानक. शाळेत मुलं शिकायला पाठवत नसत. शेरडं-मेंढरं वळायला जात. गावात देवीचा डॉक्टर आला, म्हणजे एखाद्या घरात मूल जन्मलं असेल, तर भीतीनं ते त्याला रानात पळवून नेत. तशी खूपच सोशिक जमात. स्वत: होऊन कुणाची कागाळी काढत नसत.
एका गोष्टीची मात्र मला ठाकरांची चीड यायची. तसे ठाकर हे आदिवासीच; स्वत:ला महादेवाचे वंशज समजत. आम्हा मंडळींचा त्यांना बाट लागे. पाणीही वरून
पाजायचे. चटणी-भाकरी द्यायची असेल तर तीही वरूनच. ठाकरांच्या व्यवहारात जातीयता आली कशी, हाही प्रश्नच आहे. त्यांनी गावातील मराठ्यांचं तर अनुकरण केलं नसावं ना!
गावात जातीयतेच्या इंगळ्या डसलेल्या. ठाकरांनाही विटाळ पाळावा, हा कळसच. शहरात हा जाच नव्हता, असं दिसतं.
हेही काही तितकंसं खरं नाही. शाळेतील मित्र बदलले होते, याचा अर्थ तालुक्याच्या गावी बदल होत होता, असंही काही नाही. हॉटेलबाहेर प्रथम अस्पृश्यांकरता वेगळा कप पाहिला तो तालुक्याच्याच गावी. हा कप कोणत्या साली गेला, हे काही सांगता येत नाही; पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो काही वर्ष होता, एवढं मात्र नक्की आठवतंय. कायदा झाला होता; पण कुणाला धाडसच होत नव्हतं. तालुक्याच्याच गावच्या एका मांगानं धाडस केलं. त्याचा कित्ता बाकीच्या अस्पृश्यांनी गिरवला. मालकांनी किंवा गावातील मंडळींनी विशेष खळखळ केली नाही. हे जसं कपाचं, तसं न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेणं हे आम्हा पोरांना खूपच दिव्य वाटायचं. एकदा मात्र दुकानात जाऊन केस कापावयास जाण्याचं धाडस केलं. दुकानदारानं कसं ओळखलं कुणास ठाऊक? त्याला आपल्या चेहऱ्यावरील जात तर वाचता येत नसावी ना, या शंकेनं हैराण झालो. कान पाडलेल्या गधडीनं मागं परतावं तसा परतलो. आम्ही, शाळेत जाणारी मुलं सुदामबुवाकडून केस कापून घेत असू. पण तालुक्याच्या गावी शाळेत गेलो म्हणजे हे केस फारच बेंगरूळ दिसत. तालुक्याच्या गावी महारवाड्यात जाऊन पुढं आम्ही रामजी ह्या माणसाकडे जाऊन केस कापून घ्यायचो. दुधाची तहान ताकावर भागविण्याचा तो प्रकार. दुकानात केस कापतात एवढं ते स्किल्ड वर्क नसायचं. पुढं पुढं दुकानातही आमचे केस कापू लागले. पण आत जाताना मात्र बराच काळ काळीज धडधडत असायचं. शहरात केस जरी सर्रास कापले जायचे, तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार- चांभारांचे केस कापायचा नाही. वाटायचं, खुशाल म्हशी भादरतो, पण म्हशीपेक्षाही आमची किंमत जादा नसावी ना? आपलं गावचं गिऱ्हाईक तुटेल ह्या भीतीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करीत नसावा.
ह्याच दरम्यान माझ्या जीवनात एक महत्त्वाचा बदल झाला. पाचवीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो होतो. पुढं शिकावं ही दुर्दम्य इच्छा होतीच. शाळेत सोनवणे नावाचे एक जातीचेच मास्तर होते. त्यांचं माझ्या प्रगतीकडे चांगलं लक्ष होतं. त्यांनी एकदा माझ्याकडून 'तालुक्यात असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळावा' असा अर्ज लिहून घेतला होता. खरं म्हणजे, तो अर्ज तसा मी विसरूनच गेलो होतो. मी परीक्षा पास होतो आणि वसतिगृहात प्रवेश दिल्याचं पत्र अहमदनगर येथील लोकल बोर्डाच्या ऑफिसातून येऊन थडकतं. मला खूपच आनंद होतो. एक तर त्यामुळं, आईचं ओझं थोडंफार हलकं होणार असतं. साचलेल्या पाण्याचा ओघ अचानक कुणी
तरी वळवावा, तसं वाटतं.
तालुक्यात ज्या मैदानात आठवड्याचा बाजार भरायचा, तिथे हे मुलांचं वसतिगृह होतं. लांबच लांब, पांढऱ्या रंगाची इमारत. वर चिंचोळी कौलं. भोवताली तारेचं कंपाउंड. इमारतीपासून जवळच मुलांच्या जेवणा हॉल. मुलांना आंघोळ करण्यासाठी प्रशस्त विहीर. गावातल्या शाळेत जायचं आणि वसतिगृहात मुक्काम करायचा. तिथे मोफत जेवणाची सोय. यापेक्षा मला वेगळं काय हवं होतं? स्वर्गाची कल्पनाही बहुधा अशीच असावी.
पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वसतिगृहात माझ्या पुढ्यात काय ताट वाढून ठेवलंय याची किंचितही कल्पना आली नाही. वसतिगृह तसं कोळ्यांच्या मुलाचं म्हणून प्रसिद्ध. डांग भागातील सारीच महादेव कोळी मुलं. ह्या मुलांव्यतिरिक्त मीच पहिला महार विद्यार्थी वसतिगृहात आलेला. जातीचा अहंकार- मग तो कितीही खालच्या तळातील असो - हा केवढा मोठा असू शकतो, आणि त्यामुळे आयुष्यभर डसणाऱ्या इंगळ्या तिथं कशा भेटल्या, हे आठवलं म्हणजे आजही अंगाचा थरकाप होतो.
पहिल्याच दिवशी टोळ्याटोळ्यांनी मुलं जमून माझ्याकडे पाहत कुजबूज करू लागली. माझी ज्या खोलीत वर्णी लागली होती, तिथं वरच्या वर्गातील, थोराड शरीराचा एक लंगडा मुलगा होता. त्याला दाढी-मिश्या आलेल्या. त्यानं मला दमात घेतलं, “तू आमच्या पंगतीत बसू शकत नाहीस. हॉलच्या दरवाज्याजवळ बसावं लागेल !” बाकीच्या मुलांनीही त्याचीच री ओढली. तो बहुधा सर्वांचा नेता असावा. मला तर तो तैमूरलंगच भासला. आजवर तसे मी खूपच बरेवाईट अनुभव पचवलेले; पण त्या दिवसाचा डंख आजही विसरू शकत नाही. पुस्तकाची संगत जडल्यामुळं माझं मूळचं संवेदनाक्षम मन हे जादाच संवेदनाशील झालेलं. तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. बोर्डिंग सुपरिटेंडंटही त्यांचाच जातवाला. तांब्या-भांडं घासून, लखलखीत करून जेवणाच्या हॉलकडे गेलो, तेव्हा त्यांनीही समज दिली, "हे बघ, तू महाराचा आहेस. पुढं हॉलमध्ये सरकलास तर तुझा चेंदामेंदा होईल." मी गुपचूप हॉलच्या दरवाज्यापाशी बसतो. थोडं अंतर ठेवण्यास मी विसरलो नव्हतो. मी पंगतीतल्या मुलांकडे बघतो. सारी माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघतात. "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे" ही मुलांच्या तोंडातील प्रार्थना मला आणखीनच डागण्या देते.
खरं म्हणजे हा अपमान मी निमूटपणं सहन करायला नको होता. मी एकदा जरी धाडस दाखवलं असतं, तर साऱ्यांचा विरोध कोलमडला असता.
विद्रोही कविता लिहिणं तसं पाहता सोपं. स्वत:वर बेतलं म्हणजे कळतं. मी स्वाभिमानशून्य जगलो, याचा आज मला विषाद वाटतो हे मात्र खरं. पण तेव्हा वाटायचं, खरंच आपल्याला ताठ कणा नाही काय? सालं, आपण एवढे भित्रे कसे? ही भीती आपल्याला कुणी दिली? एखादं रस्त्यात सरपटणारं जिवाणू असावं आणि येताजात पोरांनी त्याला काठीनं डिवचावं, जिवाणूनं साधा फूत्कारही टाकू नये, असं आयुष्य होतं. कधीकधी वाटायचं, घासभर गोळ्यासाठी आपण किती लाचार! स्वतःच्या हिमतीवर का बरं शिकलो नाही? हातात ताट आणि तांब्या घेऊन मी हॉलबाहेर पडत असे, तेव्हा जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या कैद्यासारखं वाटायचं... पायात लोखंडी साखळदंड आहेत. साखळदंडाचा खुळम् खुळम् आवाज होतोय... दूरवर बघायचो. निळंभोर, भव्य आकाश पसरलेलं दिसायचं. वाटायचं, खरंच का कधीकाळी आपल्याला ह्या आकाशात स्वैर उंच भरारी मारता यायची नाही ?
वसतिगृहात दर शनिवारी मारुतीचं स्तोत्र व्हायचं. सोबत भजन. 'वैष्णव जन तो तेणे कहिये, पर पीडा जो जाणे रे' हे गांधीजींचं आवडतं भजन तिथंच प्रथम ऐकलं. माझा आवाज तसा चांगला. एकांतात असलो, म्हणजे मनसोक्त गायचो. वसतिगृहात भजनं म्हणायला मी सर्वांच्या पुढं. बाकीची कोळ्यांची मुलं मागून साथ करीत. प्रसाद वाटताना प्रसादाचं खोबऱ्याचं ताट मात्र माझ्या हाती केव्हाच दिलं जायचं नाही. हा अपमान थुंकी गिळतात तसा गिळून टाकायचो. अशा वेळी हमखास महारोगानं सडलेल्या गावच्या हरीच्या बापाची आठवण यायची. मी माझ्याच हाताकडं पाहायचो. आपल्या हाताला रक्तपिती तर फुटली नाही ना? जोरात किंचाळावंसं वाटायचं. तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात तो हाच काय? 'गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. खरंच, कशाला झाली पुस्तकांशी ओळख ? बरा ओहोळाचा गोटा...' त्यावेळी थोडं फार असंच वाटत होतं.
ह्या जखमेवर थोडीशी फुंकर मिळाली, ती खरात पाळक यांच्यामुळे. हे एक ख्रिस्ती धर्माचे प्रचारक होते. गोरेपान. त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मित. मोठं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. बहुधा एका काळचे ते महार असावेत. कारण महारी भाषेतल्या अनेक लकबा त्यांच्या बोलण्यात डोकावत. प्रॉटेस्टंट असल्यामुळे फादरसारखा त्यांना झगा घालावा लागत नसे. संसार थाटूनच ते धर्मकार्य करीत असत. नदीकाठी एका टेकडीवर त्यांच्या राहत्या घरापाशी एक छोटं चर्च होतं. तिथं ते छान आवाजात प्रभूची भजनं म्हणत पेटी वाजवीत, का कुणास ठाऊक, पण वाकडी वाट करून ते वसतिगृहावर मला येऊन भेटत. खूपच आपुलकीनं वागत. हा अनुभव मला नवा होता. त्यांच्याबरोबर एकदा-दोनदा चर्चमध्येही गेलो होतो. पुढं जेव्हा संगमनेरला शिकायला गेलो, तेव्हाही त्यांची भेट होत असे. हिंदू धर्माबद्दल, आठवतं, तसं कधीच प्रेम नव्हतं. ह्या धर्मात हा भेदभाव दिसायचा नाही. खरातांनी मात्र आपल्याला केव्हाच 'धर्म सोड' असं सांगितलं नव्हतं. त्यामुळं असेल कदाचित, पण त्यांच्या धर्माबद्दल आपल्या मनात ओलावा निर्माण झाला होता. आज विचार करतोय, खरंच, का बरं आपण ख्रिस्ती झालो नाही? नाही तर ज्या जिल्ह्यात मी होतो, तिथं तर जवळ जवळ फार मोठ्या संख्येनं अस्पृश्य मंडळी ख्रिश्चन झालेली. आपल्या तालुक्यात मात्र कुणीच ख्रिश्चन झालं नव्हतं.
*क्रमशः*
सौजन्य :-
लोकसेवा सार्वजनिक वाचनालय, नागठाणे