25/03/2026
भाजपला विरोध ही Bharat Patankar यांची मुख्य भूमिका. डॉक्टर पाटणकर ज्यांच्या तालमीत तयार झाले त्या क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचीही हीच भूमिका होती.त्यांच्या भाजपला विरोध करण्याच्या आगळ्या वेगळ्या गोष्टी सांगली सातारा जिल्ह्यात आजही चर्चेत असतात.तोच कित्ता डॉक्टर पाटणकर यांनी गिरवला आहे.
भाजपला विरोध हा भारत पाटणकर यांच्या राजकारणाचा प्रमुख भाग राहिला आहे आणि भाजपला विरोध म्हणून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण केली.गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करत आहेत. पाटणकर यांची मदतीची भावना वेगळी होती आणि आहे.भाजप तत्सम पक्षाला त्या विचारधारेला विरोध म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या टिकेचे धनी व्हायला लागले.त्यांच्यावर टीका झाली हे होत असतानाही पाटणकर मात्र भाजप सत्तेत नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करत राहिले..
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते (जे अनेक वर्ष सत्तेत होते)ते मतदार संघाचा विकास करायला भाजपमध्ये निघाले होते,जात होते.त्यांना भाजप सत्तेत येणार याची ठाम खात्री होती. हे दोन्ही पक्ष अडचणीत असताना डॉ पाटणकर यांच्यासारख्या माणसांनी आघाडीचे मनोबल वाढवले. जेव्हा पाठींबा देण्याची गरज होती तेव्हा हे लोक पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून या पक्षांच्या सोबत राहिले..
डॉक्टर पाटणकर यांचा राजकीय प्रभाव किती?आणि किती मतदार संघात त्यांच्यामुळे फरक पडला हा व्यवहारी राजकीय प्रश्न विचारला जाऊ शकतो.त्याची उत्तरे सुद्धा देता येतील.पण जेव्हा सगळेच पक्षी उडून जात होते तेव्हा पाटणकर यांच्यासारख्या नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाने 'आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणणं ही गोष्टच थोर होती.कारण ज्यांना मोठे केले ते ईडीच्या भीतीने किंवा ईडीला भ्यायलो अस सोंग करून भाजपमध्ये निघाले होते तेव्हा मात्र पाटणकर यांच्यासारखा त्यागी माणूस कोणतीही अपेक्षा न ठेवता आघाडीच्या सोबत राहिला..
आपण एकटेच आडरानातून प्रवास करत असतो तेव्हा एकट्याला खूपच भीती वाटते.तेव्हा एक म्हातारा माणूस वाटेत भेटतो,तेव्हाचा प्रवास सुरक्षित वाटतो.आपल्याकडे तारुण्य असते,शक्ती असते.पण त्या म्हाताऱ्याकडे असतो अनुभव.अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ल्याचा. तोच आपला रात्रीच्या अंधारातला प्रवास सुखकर करतो.आपल्याला उजेडापर्यत यायला साथ देतो..असाच हा म्हातारा माणूस..धोतर नेसत नाही म्हणून म्हातारा वाटत नाही.दरम्यान विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू होती तेव्हा त्यांचेही नाव चर्चेत आले.तेव्हा भारत दादा म्हणाले,"मी असाच बरा आहे.मला आमदारकी नको.."
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपर्यंतच्या प्रवासात अनेकांचा वाटा आहे, त्यात डॉक्टर भारत पाटणकर यांचा आहेच.
संपत लक्ष्मण मोरे