07/08/2024
◼️ *दैनिक फ्रेश न्युज* ◼️
*लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित रानभाज्या महोत्सव आणि पाककला स्पर्धेला रत्नागिरीकरांकडून मिळाला उस्फुर्त प्रतिसाद*
कोकणात पाऊस सुरु झाला की रानावनात अनेक प्रकारच्या औषधी भाज्या उगवत असतात. ग्रामीण भागात या भाज्यांचा सर्रास वापर जेवणात केला जातो. ग्रामीण भागातील अनेक महिला या भाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. परंतु त्यांचे औषधी गुणधर्म माहित नसल्याने शहरी भागात याचा वापरही कमी होत असतो. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागामधून जवळपास 30हून अधिक बचत गटांच्या महिला रानभाज्या घेऊन या महोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या. शहरातील माळनाका जयेश मंगल कार्यालयात आयोजित या महोत्सवाला रत्नागिरीकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये अळू, टाकल्याची भाजी, काकवी, शेवग्याची भाजी, भारंगीची फुले व कोवळी पाने, काटल, कुड्याच्या शेंगा, करवंद, भुरमुले, कुरडू, घोटवेल, फोडशी, निवडुंग, पोकळा, पाथरी, कुरतुडी, ओवा पान, उंबराची फळे, ओले काजूगर, भाजीचे गरे, कोकम, कडीपत्ता, केळफूल, सुरणाची पाने यासारख्या भाज्या विविध बचत गटांनी महोत्सवामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी, खजिनदार अमेय विरकर, सचिव विशाल ढोकळे व लायन्सचे सर्व पदाधिकारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेत, महोत्सवाच्या सुरुवातीलाच या महोत्सवाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. या महोत्सवाला रत्नागिरी शाळांच्या विद्यार्थ्यांनीही भेट घेत, या भा÷ज्यांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी घरांमध्ये या भाज्या केल्या जात असल्याचेही सांगितले.
महोत्सवामध्ये रानभाज्यांची औषधी माहितीही देण्यात आली होती. विशेषत: कोणत्या भाज्या कोणत्या आजारावर उपयोगी पडतात हे सांगण्यात आले. घोटवेलची भाजी सांधेदुखी व अॅलर्जीवर, काकवी ही खनिजयुक्त आहे. कुरडूचा वापर मुतखडा व संधीवातावर, भुरमुळ्याचा वापर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पचनासाठी केला जातो. कुड्यांच्या शेंगांचा वापर गॅस व जंत यावर होतो. भारंगीची फुले व पानांचा वापर सर्दी, खोकला, तापासह मधुमेहावर होतो. टाकल्याचा वापर त्वचाविकार, मधुमेह आणि थाररॉईडसारख्या आजारांवर होत असतो. विशेषत: पावसाळ्यामध्ये येणार्या या भाज्यांचा वापर आपल्या अन्नामध्ये करावा असे आवाहनही यावेळी लायन्स अध्यक्ष गणेश धुरी यांनी केला. या महोत्सवाला जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, होड डिवायएसपी गायत्री फडके, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, डॉ. निलेश पाटील, निलेश ढमाले, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही भेट दिली.
वनभाज्या महोत्सवानिमित्ताने वनभाज्याची पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. यात विविध पदार्थ सादर करण्यात आले होते. पाककला स्पर्धात शहरी विभागात प्रथम क्रमांक उल्का पटवर्धन, द्वितीय शर्वरी धुंदूर, तृतीय मिनल धुुंदूर यांना पटकावला तर ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक सिध्दी संभाजी देसाई-नाचणे, द्वितीय प्रियंका प्रवीण गजने- मावळंगे, तृतीय प्रज्ञा जयंत फडके- पूर्णगड यांना क्रमांक मिळाला. रानभाज्यांच्या स्टॉलमध्येही स्पर्धा घेण्यात आली यात पहिला क्रमांक शीळ येथील मयुरी सावंत, द्वितीय भाट्ये येथील श्रध्दा भाटकर, तृतीय वळके येथील पूजा भुवड तर चतुर्थ क्रमांक चिंचखरी येथील मधुरा बोरकर या महिलांचा गौरव करण्यात आला.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
https://chat.whatsapp.com/Hm85cN1vg0e1hcznDuIu1k
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
https://youtube.com/?feature=shared
FRESH News is a 24-hour Marathi news channel in India. The MAHARSATRA based company was launched on 14 April 2010. . FRESH News is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. This news Registered by INDIAN Gove...