22/09/2014
नवरात्रौत्सव अर्थात घटस्थापनेचा उत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्त ‘घटस्थापने’चं हे वेगळ्या दृष्टिकोनातलं विश्लेषण...
मृत्यू झाला, की त्या मृत्यूची भरपाई नवं मूल जन्माला घालून करून देणाऱ्या स्त्रीचं महत्त्व मानवी जमातींना प्राचीन काळी नेहमीच वाटत राहिलं. कोणत्याही उपचाराची अजिबात माहिती नसणाऱ्या त्या जंगली काळापासून आणि नंतर स्त्रियांना वनस्पती-औषधांची तोंडओळख झालेल्या रानटी युगापासून ते आत्ताआत्तापर्यंत म्हणजे स्त्रिया त्या औषधांमध्ये पारंगत झाल्यानंतरच्या संस्कृती-युगाच्या पहाटेपर्यंत मूल जन्माला घालणाऱ्या स्त्रीचं महत्त्व मानवी जीवनात अनन्यसाधारण होतं.
स्त्रीच्या जननक्षमतेचं असणारं हे महत्त्व व्यक्त करण्यासाठी तिच्या जनन-अवयवांच्या प्रतिमांचं पूजन करून तिला आदरांजली वाहण्याची भारतीय परंपरा म्हणजे ‘घटस्थापना’! घट हे भारतीय संस्कृतीत स्त्रीचं गर्भाशय मानलं गेलं आहे. भारतीय वाङ्मयातून स्त्रीचा उल्लेख ‘सृष्टितत्त्व’ असा करण्यात आलेला आहे. जमिनीतून जसं रोप बाहेर येतं, तद्वत स्त्रीच्या शरीरातून मूल बाहेर येतं, असं साम्य वाटून, तसंच स्त्रीची तुलना ‘प्रसवा’ जमिनीबरोबर आहे म्हणून जमिनीच्या सुफलीकरणाचे विधी प्राचीन काळी स्त्रियांकडून केले जात असत. स्त्रीची ओटीसुद्धा फळांनी, धान्यानं भरण्याची परंपरा भारतात आहेच. घटस्थापना करताना पानवेली, सुपाऱ्या, धान्य, फळं घटांमध्ये ठेवून त्यांची श्रद्धेनं पूजा केली जाते, ती याच भावनेनं! मूर्ती-मुखवट्याविना निव्वळ धन-धान्यानं भरलेला घट जरी स्थापन केला, तरी देवता-स्त्रीची प्रतिष्ठापना झाली, असं मानलं जातं. स्त्रीसाठी भारतीय संस्कृतीत घटाची योजना ही प्रतीमात्मक (Symbolic) आहे. ‘घटा’चा आणि स्त्रीचा संबंध इतका जवळचा मानला जातो.
रानटी काळात चंद्रकलांमधले आकाशातले बदल पाहून अमावास्या-पौर्णिमा या चक्राचा संबंध मानवी जीवन-मृत्यूच्या चक्राशी आणि पुनर्जन्माशी लावला गेला. त्यात विशेष म्हणजे, चंद्राचं हे मासिक चक्र सुमारे साडेसत्तावीस दिवसांचं असतं आणि स्त्रीचं मासिक चक्रसुद्धा तेवढ्याच दिवसांचं असतं! हे साम्य पुरुषाआधी स्त्रीला समजलेलं असणार. त्यामुळं ‘स्त्रीनं चंद्रावरून पहिली दिनदर्शिका (कॅलेंडर) तयार केली,’ हा संशोधकांचा दावा विश्वसनीय मानावा लागतो. अमावास्या आली म्हणजे चंद्राचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक अवस्थेतल्या स्त्री-पुरुषांची समजूत असे; पण प्रतिपदेपासून चंद्र पुन्हा जन्म घेतो, अशीही समजूत होती. स्त्री व चंद्र यांच्या मासिक चक्राच्या समान कालावधीमुळं की काय, चंद्राप्रमाणेच मृत व्यक्तीलासुद्धा स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पुनर्जन्म घेता येऊ शकतो, असं वाटणं, हे माणसाच्या ‘पूर्वजन्म आणि पुनर्जन्म’ या विश्वासाचं मूळ म्हणावं लागेल. म्हणून मग उत्खननात कबरीच्या ठिकाणी स्त्री-जनन-अवयवांच्या प्रतिमा सापडतात. सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोऱ्यातल्या उत्खननात मृत व्यक्तींबरोबर पुरलेले कुंभ (घट) सापडल्याचं संशोधक नोंदवतात. मृत झालेल्या प्रिय व्यक्तीनं स्त्रीच्या गर्भाशयात येऊन पुनर्जन्म घ्यावा, म्हणून मृतांबरोबर पुरलेले हे कुंभ असावेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. आजच्या भारतीय परंपरेत मृतदेहाचं दहन केलं जात असल्यामुळं हाच कुंभ अंत्ययात्रेच्या वेळी मृताबरोबर घेऊन जाणं आणि मृताच्या अस्थीसुद्धा कुंभातून (कलशातून) आणणं, जतन करणं या पद्धतीचे सर्व विश्वास हे प्राचीन घटरूपी गर्भाशयाच्या कल्पनेशी जोडलेले दिसतात.
याच प्रकारे संक्रांतीला ‘सुगडा’ची पूजा होते. सुगड म्हणजेसुद्धा छोटी घटाकृती आहे आणि हासुद्धा स्त्रियांचा स्मृतिदिन आहे. स्मृती कुणाची? तर संकर नावाच्या दुष्टाचा अंत (संक्रांत/संक्रान्त) करणाऱ्या एका मातृगणाची ! हा स्मृतिक्षण संक्रांत आणि किंक्रांत अशा पाठोपाठ दोन दिवशी येतो. संकराचा व किंकराचा वध करण्यासाठी या लढाऊ, योद्धा स्त्रियांनी त्या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि स्त्री-समाजाला या दोन दुष्टांचा जो उपसर्ग होत होता, त्या उपसर्गापासून स्त्रियांची मुक्तता केली. मात्र, ज्या अर्थी नेहमीच्या मोठ्या घटाऐवजी ‘सुगड’ हे त्याचं लहान रूप वापरून त्याची या दिवशी पूजा होते, त्याअर्थी तारुण्यात नुकतंच पाऊल ठेवलेल्या कन्यकांच्या संबंधात हा संघर्ष झाला असावा, असं वाटतं. त्या कन्यकांची ही स्मृती संक्रांतीदिनाद्वारे सुगडाच्या पूजनातून स्त्रियांनी आजही जपलेली दिसते. मात्र, या दिनाचं रूपांतर आज ‘सणा’त झालेलं दिसतं.
घट ही जशी स्त्रीच्या गर्भाशयाची खूण भारतीय संस्कृतीत मानली जाते आणि मृत व्यक्तींनी त्यामध्ये पुनर्जन्म घ्यावा, या कल्पनेतून असे घट मृतदेहाबरोबर पुरलेले उत्खननात आढळले, त्याप्रमाणेच असे विश्वास पाश्चात्य संस्कृतीतही आढळतात. १९६० मध्ये युरोपातल्या रूमानिया आणि सर्बिया या देशांत लेपन्स्की नदीकाठी झालेल्या उत्खननात १५ फूट लांबीची कबरीची बांधकामं ही सर्व त्रिकोणी आकारात आढळून आली, असं संशोधन ‘The Living Goddes’ या पुस्तकात Dr. Marija Gimbutas नोंदवतात. या आकाराबाबत पाश्चात्य संशोधकांचं मत भारतीय संशोधकांप्रमाणेच आहे. त्यांच्या मते ः ‘‘मृत व्यक्तीचं दफन हे स्त्री-जनन-अवयवांच्या त्रिकोणी आकाराच्या कबरीत केल्यास, त्याला त्या जननस्थानातून पुन्हा सहज जन्म घेता येईल, अशी प्राचीन पूर्वजांची कल्पना होती.’’
उलट्या ‘त्रिकोणा’प्रमाणेच मृत शरीराबरोबर ‘कवड्यां’चं दफन हासुद्धा याच विश्वासाचा भाग असल्याचा उल्लेख ‘When the drummers were women’ या पुस्तकात Layne Redmond ही लेखिका करते. कवडी हे स्त्रीलिंगाशी साम्य दाखवणारं आणखी एक प्रतीक. पालिओलेथिक कालखंडात, म्हणजे सुमारे इसवीसनपूर्व १० हजार वर्षांपूर्वी, पुरलेल्या अशा असंख्य कवड्या उत्खननात सापडल्याचं Redmond यांनी नोंदवून ठेवलं आहे. आपल्याकडंसुद्धा देव्हाऱ्यात मोठ्या कवडीचं पूजन करण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामागचे स्त्री-संदर्भ आज गळून गेलेले आहेत.
उत्खननातल्या घटांचे अवशेष, त्रिकोणी आकारातल्या कबरी, कवड्यांचं पूजन या सगळ्यामागं स्त्रीच्या जननक्षमतेसंबंधी पूज्य भाव आणि आदर व्यक्त करण्याखेरीज अन्य कोणत्याही संकल्पनेची शक्यता संशोधकांना वाटत नाही. त्यातही भारतीय संस्कृतीतल्या घटाचं महत्त्व, ते व्यक्त करणारे सण-सोहळे आणि आजपर्यंत टिकून राहिलेले त्याबाबतचे विश्वास पाहता पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातली मातृसंस्कृती दीर्घकाळ बळकटपणे टिकून होती, असे संकेत या घटाच्या इतिहासातून मिळतात!