02/06/2025
*🚩🚩🚩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशतजयंती सांगता सोहळा नांदेड सिटीत उत्साहात पार पडला*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जन्मवर्षाच्या* सांगता सोहळ्याचा समारोप शनिवार, दिनांक ३१ मे रोजी नांदेड सिटीत एका उद्बोधक व्याख्यानाच्या माध्यमातून संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर आकाशवाणीच्या अधिकारी, प्रसिद्ध लेखिका व कार्यक्रम निर्मात्या *सौ. अरुणाताई चौधरी* होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून इतिहासाच्या गाढ्या अभ्यासक व सुसंवादिनी साहित्यिका *सौ. श्यामाताई घोणसे* यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. *भारतीय स्त्रीशक्ती, नांदेड सिटी व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम* आयोजित करण्यात आला.
यानंतर समूह गायनाच्या माध्यमातून अहिल्यादेवीं च्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी गीत सादर करण्यात आले. *सौ. अर्चनाताई कौलगुड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत* भारतीय स्त्रीशक्तीच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली तसेच *अध्यक्ष सौ. अरुणाताई चौधरी यांचा परिचय* उपस्थितांना करून दिला.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. अन्य मान्यवरांचे गुलाब पुष्पांनी स्वागत करण्यात आले, तर श्रोत्यांना सोनचाफ्या ची फुले देण्यात आली. संपूर्ण सभागृहात एक भारलेलं आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झालं होतं.
सेवा विभाग प्रमुख *श्री. मिलिंद दीक्षित यांनी प्रमुख वक्त्या सौ. श्यामाताई घोणसे यांचा परिचय करून दिला*. अध्यक्षीय भाषणात सौ. चौधरी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं च्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समर्पक आढावा घेतला.
यानंतर सौ. श्यामाताई घोणसे *यांचे सव्वा तासांचे प्रभावी आणि ओघवते व्याख्यान झाले. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले*. त्यांनी अहिल्यादेवीं च्या *अंगभूत गुणधर्मांचा, कार्यशैलीचा व इतिहासातील योगदानाचा सखोल अभ्यास सादर केला*.
*“मराठा साम्राज्याचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या व्यक्ती जर कोणी असेल, तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच!”* असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. तसेच, *छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवीं वरील त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दल* माहिती दिली.
*तीनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या महान स्त्रीने* अनेक वैयक्तिक संकटांवर मात करत प्रभावीपणे राज्यकारभार केला. त्यांनी *धर्मशाळा, विहिरी, अन्नधान्य साठा, काशी विश्वनाथ मंदिर बांधणीसारख्या ऐतिहासिक कार्यांची माहितीही* श्रोत्यांसमोर मांडली. त्या अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या, लेखा व्यवस्थापनात प्रवीण अशा अद्वितीय नेत्या होत्या.
*त्यांच्या जीवन कहाणीतून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते, असेही* सौ. घोणसे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘पसायदान’ गायनाने झाली.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये *ॲड. श्री. नरसिंग लगड, डॉ. अंबादास देवकर, श्री. महेश देसाई, श्री. आनंद गलगली, डॉ. शितलकुमार गांधी, श्रीकांत कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी, श्री. संदीप हिंगाणे, श्री. जगदीश कुकडे, डॉ सौ सुनीता शेवगावकर, सौ. विद्याताई सरजे, सौ. स्नेहा करमरकर, श्री. शामराव गायकवाड, श्री मंगेश भागवत, श्री. शंकरराव इंगवले, श्री. प्रकाश गोरे* यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन *डॉ. नेत्रा देशपांडे* यांनी तर आभार प्रदर्शन *सौ. मोनाली शहा* यांनी केले.