28/01/2026
किती धावपळ होती तुमच्या आयुष्यात दादा. बरं तुमच्यासोबत सगळ्यांना धावायला लावायचे ते ही एकदम पट्टीत. आम्ही बातम्या करायचो दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापलं. काम पुन्हा करायला सांगितलं. काम म्हणलं की तुम्हाला जोम असायचा.
दादांना भेटलं की काम होतंय हा मंत्रालयातला एक अलिखित नियम. म्हणूनच मुख्यमंत्र्यांइतकाच गजबजाट दादांच्या ऑफिसला असायचा. कागद हातात आलाय आणि त्याचं उत्तर दादांकडे नाही असं कधी झालं नाही. कामाची त्यांची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात.
दादा एखाद्या दौऱ्याला गेलेत आणि त्यांना एखादं मजेशीर कॅरेक्टर भेटलं नाही असं झालं नाही. 'मला सगळ्यांनी साथ द्या' असं म्हणतात कुणीतरी संबळ वाजवावा आणि दादांनी म्हणावं 'तू गबस तू नको साथ देऊ' आणि सगळ्यांसोबत स्वतःही हसावं. 'वो छोडके गये कैसा लगा' दादा म्हणतात 'अच्छा नहीं लगा' आणि जोक व्हावा सगळे फुटावे. कुणीतरी खालून भाषण सुरू असताना आय लव्ह यु दादा म्हणावं आणि दादांनी म्हणावं अरे बायकोला म्हण लव्ह यु लव्ह यु. कार्यक्रमात कुणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा दादांनी त्यावरून विनोद करावा. फडणवीस-शिंदे आणि दादा सोबत असताना शिंदेंनी काहीतरी बोलावं आणि दादांनी 'हमारा फिक्स है हम जा रहे है' 'अजून विसरले नाहीत' असे पंच टाकावेत. सगळे लोटपोट व्हावेत. कुठेतरी गाडी थांबवावी मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटावं काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किस्यांचाच एखादा खंड होईल.
राजकारणात काही तडजोडी झाल्या तरी कुटुंब म्हणून त्यांची आपुलकी कायम राहिली. बाहेरच्यांना कुटुंबात जास्त घुसून दिलं नाही. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे तंत्र त्यांनी कसोशीने पाळलं. त्यामुळं फुटीनंतर सुद्धा अनेक जिव्हाळ्याचे क्षण आपण पाहिले.
राजकीय भूमिकांमुळे काही आरोपांमुळे टीकाही झाल्या मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचं व्हिजन क्लिअर होतं, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडं पाडलं.
व्हिजन पाहिजे तर दादांसारखा नेता पाहिजे, दादांनी केलेली अनेक कामं सांगता येतील, शिवाय कुणाचंही काम असो ते बेष्ट झालं पाहिजे यासाठी आग्रही असणारा हा व्हिजनरी नेता. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता.. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता.
असे नेते फार कमी घडतात, अर्थात दादा घडण्यामागे शरद पवार आहेत मात्र यात त्यांची मेहनत, अभ्यास, सातत्य आणि लोकांची जुळलेली नाळ या गोष्टी दादांना 'दादा' बनवून जातात. दादांची तुलना शरद पवारांशी व्हायची मात्र त्यांनी स्वतःला तिकडं नेलं नाही, ते स्वतः भन्नाट होते.
आता हे ट्रेनमध्ये लिहीत असताना दादांच्या बातम्या बघणारी कित्येक लोकं भावुक झालीत, माझ्या डोळ्यातलं पाणी मी रोखू नाही शकलोय.
अवघड होऊन बसलंय, पवार फॅमिली आणि दादांवर प्रेम करणारी माणसं यातून कशी सावरतील हा बिकट प्रश्न आहे.
धक्के देण्यात दादा माहीर होते, मात्र एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं दादा.
आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येतंय, दादा बजेट मांडताना दिसले असते, काही शेर आले असते काही टोलेबाजी झाली असती, मजा आली असती.
अजातशत्रू नेता गेला... दादांची धावपळ थांबली. महाराष्ट्र सुन्न झालाय.
दादा, लव्ह यु... 🙏🏽
#अजितपवार #निलेश्राव #अजितदादा