14/10/2021
नमस्कार मंडळी,
आज आपण वृक्षलागवडीचे बिहार पॅटर्न काय आहे त्याबाबत माहिती घेउ.
बिहार पॅटर्न' अंतर्गत गावाच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिली जाते. ग्रामपंचायतीमार्फत मनरेगांतर्गत गरीब कुटुंबांना काम देण्यात येते.
मनरेगांतर्गत पहिले १०० दिवस २०० झाडांचे संगोपन आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या एका कुटुंबाला दरमहा सहा हजार ७५ रुपयांची रक्कम केंद्र सरकारमार्फत दिली जाते. उरलेल्या २६५ दिवसांमध्ये झाडांच्या संगोपनासह सरंक्षणाचा खर्च हा राज्य सरकारने उचलणे अपेक्षित आहे.
परंतु, राज्य सरकारवर आर्थिक बोजा येऊ नये यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी आणखी तीन कुटुंबांना वृक्ष संगोपन, संरक्षणाचे काम प्रत्येकी १०० दिवसांसाठी नव्याने दिले जाते. त्यामुळे त्या कुटुंबांना रोजगाराची हमी मिळते. त्यांच्या खात्यावर केंद्र सरकारमार्फत पैसे जमा होतात. झाडांच्या संगोपनासाठी ग्रामपंचायतींना सरकारकडून वेगळा निधी देण्यात येत आहे. त्या निधीच्या माध्यमातून रोजगार मिळविणाऱ्या कुटुंबांना खते, अवजारे, हत्यारे, प्लास्टिकचे कागद यासारखे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.
गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरून भविष्यात नक्कीच १०० टक्के झाडे जगतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रयोगांतर्गत साग, चंदन, बांबू, आवळा, हिरडा, अर्जुन, सिताफळ, चिंच, जांभूळ, खैर, आंबा यासारखी २२ प्रकारची झाडे लावली जात आहेत. बिहार पॅटर्नच्या आधारावर पुणे जिल्ह्यात पाच लाख ७५ हजार झाडांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात आठ लाख झाडे लावण्यात आली आहेत. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या दरम्यान एकट्या पुणे जिल्ह्यात ८ कोटी ४० लाख रुपयांचे काम झाले आहे.
प्रत्यक्षात काम हवे असेल तर ग्रामीण भागातील त्या नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करणे अपेक्षित आहेत. मागेल त्याला काम या धोरणानुसार आता 'बिहार पॅटर्न' राबविताना 'मनरेगा'तून प्रत्येकाला कामही मिळत आहे. काही वर्षांपूर्वी चोहीकडे हिरवळ पाहायला मिळत होती. ती नाहीशी झाली. आता निसर्गाला पूर्वपदावर आणण्यासाठी त्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न किती यशस्वी होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. १०० टक्के झाडे वाचतील का, जगतील का हे आताच सांगणे योग्य ठरणार नाही, परंतु जर प्रयत्न केले तर नक्की पुर्वीसारखी हिरवळ पाहायला मिळेल आणि एक निसर्गरम्य वातावरण चोहिकडे होइल अशी आपण मनोकामना करूया.
धन्यवाद..........🙏
ग्रामपंचायत संबंधित अशा विविध माहितीसाठी आमच्या Telegram group मध्ये तुम्ही सामील होऊ शकता.
https://t.me/joinchat/UdeB0JXNyR04MTY1
संदीप थोरे
अध्यक्ष बीड जिल्हा
युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य.🙏🙏🙏