19/07/2018
*पालघर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक...*
*"ओला दुष्काळ" जाहीर करण्याची केली मागणी*
पालघर, - पूरजन्य परिस्थितीच्या पाश्वभूमीवर
पालघर जिल्ह्यात "ओला दुष्काळ" जाहीर करा ही मागणी करीत, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर
पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वा खालील मनसे शिष्टमंडळाने आज पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शेतकरी, मच्छीमार, आदिवासी बांधव आणि सर्व सामान्य जनतेचे विविध प्रश्नांवर प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी पालघर आणि मनसेचे शिष्टमंडळ यांच्यात विस्तृत चर्चा झाली. स्थानिक कामगार भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करावी, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल बंदर, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग या विनाशकारी प्रकल्पामुळे सर्वसामान्य जनता, भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी बांधव देशोधडीला लागणार असल्याने, अशा विनाशकारी प्रकल्पास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असल्याचे आज पुन्हा जाहीर केले.
तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नवीन पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रकल्प ग्रसतांना लाभ व रोजगार दिला गेला नाही. ३ व ४ अणुऊर्जा प्रकल्पातून नोकरीसाठी कॉल येतात पण प्रकल्पग्रसतांना नोकरीत मुद्दाम डावलुन त्या ऐवजी परप्रांतीयांना नोकरीत सर्रास सामावले जात असल्याची गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांचा निदर्शनास आणून दिली.
रेशनिंग मधील धान्य पुरवठ्यात मोठया प्रमाणात होत असलेला काळा बाजार व दलालांची घुसखोरी रोखून कायदेशीर कारवाई करणे बाबत मागणी केली. आदिवासी "उत्थान पॅकेजची योग्य अंमलबजावणी करून, आदिवासी बांधवांचे स्थलांत्तर कसे रोखता येईल यावर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत असे सांगून, पालघर जिल्ह्यातील रिलायन्सच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना, २०१३ भूसंपादन कायद्या नुसार बाजार भावाच्या उच्चतम मूल्यानुसारच नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.
परंतु, रिलायन्स कंपनीने मनमानीपणे आणि मुजोरपणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दर दिला असून, एकाच गावात भिन्न भिन्न दर दिले गेलेले आहेत या बाबत आपण अत्यंत गंभीरपणे याचा जाब संबंधितांना विचारणे गरजेचे आहे. जेणेकरून, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा मनसे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
जिल्ह्यातील प्रलंबित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न मच्छीमार संस्थांना वीज अनुदानात वाढ करणे, मच्छीमार संस्थांना उद्योगात न मोडता शेतीमध्ये घेणे यासम मच्छीमार बांधवांचे विविध प्रश्न व त्यावर उपाययोजना त्वरित कराव्यात या बाबत विनंती करून, स्थानिकांच्या उप जिवीकेचे साधन असलेला रेती व्यवसाया बाबत आपल्या स्तरावर योग्य धोरण राबवील्यास स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पालघरच्या जिल्हा प्रशासनाने गाजावाजा करीत रोजगार मेळावा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले याचा जाब विचारीत, जिल्हा प्रशासनाने स्थानिक बेरोजगारांची फसवणूक केली असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.
मूलभूत नागरी सोयीसुविधा आणि पायाभूत सोयीसुविधांच्या उपाययोजनेवर आपले प्रशासन जर गंभीर नसेल, तर मनसे आता आक्रमकरित्या प्रश्न हाताळणार असल्याचे मनसे शिष्टमंडळाने जाहीर केले.
मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील भात पिके पाण्याखाली गेल्याने पेरण्या कुजून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे पावसामुळे दोन ते तीन वेळा वाहून गेले. त्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला असून, त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे विदारक चित्र स्पष्ट करून, पालघर जिल्ह्यातील हवालदिल बळीराजाच्या पुनर्वसनासाठी येत्या सात दिवसांत "ओला दुष्काळ" जाहीर करून, बळीराजासाठी विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे या प्रकारची आग्रही आणि प्रमुख मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी आणि मनसे शिष्टमंडळ यांच्यात साधक बाधक चर्चा होऊन, नुकसान झालेल्या भात पिकाचे आणि नुकसानग्रस्त सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला दिले असल्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. तसेच, स्थानिक बेरोजगारांबाबत लवकरच एक बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच, विविध प्रकल्पांना मनसेचा असलेला विरोध सरकार स्तरावर कळविण्यात येईल व या बाबत योग्य ती दखल घेण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरेंनी दिली. जनतेचे प्रश्न आपल्या समोर मांडून, या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशिलपणे व नैतिक जबाबदारीने कामे पार पाडावीत अशी रास्त अपेक्षा पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी यावेळी व्यक्त केली.
पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वा खाली मनसे शिष्टमंडळासोबत उपजिल्हाध्यक्ष अनंत दळवी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, वाडा तालुकाध्यक्ष कांती ठाकरे, तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत, पालघर शहराध्यक्षा गीता संखे, मनवीसे उपजिल्हा अध्यक्ष धीरज गावड, वाडा तालुका सचिव देवेंद्र भानुशाली, उपतालुका अध्यक्ष मंगेश घरत, चेतन संखे, शिवाजी रेंबाळकर, विशाल जाधव विभाग अध्यक्ष विजय अतकरी, वैभव घरत, वैभव किणी, पालघर शहर सचिव शैलेश हरमळकर, उपशहर अध्यक्ष उदय माने, मनवीसे बोईसर विधानसभा सचिव विजय गांगुर्डे, मनवीसे तालुका अध्यक्ष धीरज पाटील, मनवीसे बोईसर शहर अध्यक्ष ललितेश संखे, मनविसे विभाग अध्यक्ष वैभव नाईक, तन्मय संखे, विनायक कोळस्कर, रत्नदीप एडवनकर, गणेश घोलप, आकाश भोईर, सुनिल पाटील, नयन पाटील, रत्नदीप पाखरे, सुनिल निकम, मंगेश बोरकर, सौरभ संखे यासंह जिह्यातील महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.