29/03/2026
*▪️पोहरादेवी येथे राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेचे संमेलन उत्साहात संपन्न..*
*—————————————————*
*“धर्मसत्ता आणि साहित्यसत्ता भक्कम असेल, तर राजसत्तेचा मार्ग आपोआप सुकर होतो.” - किसनभाऊ राठोड*
*—————————————————*
*पोहरादेवी, ता. मानोरा (जि. वाशीम) :* २५ मार्च -
संपूर्ण भारतातील गोर बंजारा समाजाची ‘काशी’ म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यात्रेनिमित्त गोर बंजारा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. तीर्थक्षेत्र भक्तिधाम येथील भव्य सभामंडपात संपन्न झालेल्या या संमेलनास विविध नामवंत साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती लाभली. ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ झालेल्या या साहित्य संमेलनात पारंपरिकतेचा साज, सांस्कृतिक ऊर्जेची लय आणि साहित्यिक चर्चांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष श्री. मोतीराम राठोड, उद्घाटक भगवंत सेवक किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण, प्रा. विलासभाऊ राठोड, प्राचार्य डॉ. गणपत राठोड तसेच विविध नामवंत गोर बंजारा लेखक, कवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. मोतीराम राठोड होते, तर प्रख्यात उद्योगपती व धर्मनेते किसनभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष राठोड व प्राचार्य डॉ. गणपत राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. विलासभाऊ राठोड यांनी समन्वयक म्हणून कार्यक्रमाची सूत्रे यशस्वीपणे हाताळली. प्रास्ताविकातून त्यांनी परिषदेच्या उद्दिष्टांचा आढावा घेतला. स्वागताध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष राठोड यांनी गोर बंजारा इतिहासाचा परामर्श घेत समाजबांधवांनी आपल्या भाषा, साहित्य व संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले, तर प्राचार्य डॉ. गणपत राठोड यांनी समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करत एकजुटीची गरज अधोरेखित केली. तसेच गोर बंजारा समाजातील युवकांनी व्यसनापासून दूर राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी असे प्रतिपादन केले.
प्रारंभी साहित्यिकांचा सत्कार व विशेष गौरव सोहळा पार पडला. विविध मान्यवरांच्या भाषणांतून समाजाच्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण करताना भविष्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मा. मोतीराम राठोड यांनी साध्या व ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करत नव्या पिढीने आपली भाषा, संस्कृती आणि लोकसाहित्य जतन करण्याचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी साहित्य, शिक्षण आणि संघटन या त्रिसूत्रीची गरज त्यांनी स्पष्टपणे मांडली. तसेच गोर बोलीतील काही रंजक बोधकथांचे दाखले देत त्यांनी आपल्या भाषणाला अधिक प्रभावी आणि रसपूर्ण बनवले.
या परिषदेत ‘जागतिकीकरणाच्या रेट्यात गोर बंजारा भाषा, संस्कृती आणि साहित्याचे जतन व संवर्धन’ तसेच ‘गोर बंजारा समाजाचे एस.टी. आरक्षण : पार्श्वभूमी, आवश्यकता आणि वर्तमान स्थिती’ या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली. प्राचार्य डॉ. गणपत राठोड, श्री. होमसिंग पवार, साप्ता. बंजारा पुकारचे संपादक श्री. अविनाश चव्हाण, नांदेड, प्रा. सुनिता राठोड, पुसद, कु. राजश्री आडे आदी वक्त्यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक जनजागृती, धोरणात्मक नियोजन आणि एकात्मिक संघटनाची गरज अधोरेखित केली. विशेषतः एस.टी. आरक्षण विषयक चर्चासत्रात कु. राजश्री आडे यांचे विचार लक्षवेधी ठरले.
चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवरांचा किसनभाऊ राठोड, संमेलनाध्यक्ष मोतीराम राठोड, स्वागताध्यक्ष डॉ. सुभाष राठोड व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे गोर बंजारा बोलीभाषेतील बहारदार कवी संमेलन होय. हिंगोलीचे कवी रतन आडे, बाबुलाल राठोड, प्रेमकिसन राठोड (पुणे), डॉ. शांतीलाल चव्हाण (पातूर), नागपूर येथील कवी उदलभाऊ राठोड तसेच सुरेशभाऊ राठोड (भिवापूर) यांनी आपल्या प्रभावी काव्यरचनांद्वारे समाजजीवन, संघर्ष आणि सांस्कृतिक अस्मिता जिवंत केली. पारंपरिक लोकगीते व लोकनृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत लोकसंस्कृतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रेमकिसन राठोड, श्री. मिथून राठोड यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. मिथून राठोड यांनी केले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गोर बंजारा समाजातील साहित्यिक चळवळ, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
एकंदरीत, या भव्य साहित्य संमेलनाने गोर बंजारा समाजातील साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला नवे बळ दिले असून, सामाजिक ऐक्य व जागरूकतेचा प्रभावी संदेश दिला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून नव्या पिढीत सांस्कृतिक अभिमानाची जाणीव अधिक दृढ होऊन, शिक्षण, साहित्यनिर्मिती आणि सामाजिक प्रबोधनाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.