19/02/2026
🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 🚩
आज १९ फेब्रुवारी २०२६ — महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती!
आजचा दिवस हा महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे.
आज प्रत्येकजण एकत्र येऊन जल्लोषाने, आनंदाने, अभिमानाने आणि ढोल-ताशांच्या गजरात, फटाके फोडून ही जयंती साजरी करतो.
महाराज, तुम्ही सर्व मावळ्यांचा अभिमान आहात.
शिवबा पासून छत्रपतीपदापर्यंतचा तुमचा प्रवास आम्हाला शिकवतो की जिद्दीने लढणे हेच यशाचे रहस्य आहे.
पण एक प्रश्न आहे — महाराज आपल्याला खऱ्या अर्थाने समजले आहेत का?
आजच्या या पवित्र दिवशी आपण महाराजांशी थोडं बोललं पाहिजे…
महाराज, तुम्ही लहानपणी घेतलेली सुभेदार दादोजी कोंडदेव यांच्याकडून तालिम आणि त्यावर मिळवलेले प्रभुत्व पाहून आम्हाला असा संदेश मिळतो की शिक्षण हे फक्त घेण्यासाठी नसते; ते घेतल्यानंतर त्या शिकलेल्या गोष्टींनी शिखर गाठायचे असते.
महाराज, तुमचे आई राजमाता जिजाबाई यांच्यावरील प्रेम आणि आदर आम्हाला नेहमी हे शिकवतात की आईचा दर्जा खूप मोठा आहे आणि ती आपल्या जीवनातील खरी गुरु असते.
महाराज, तुम्ही राजघराण्यात जन्म घेतला, पण कधी स्वतःला मोठे आणि इतरांना छोटे असे मानले नाहीत. यावरून आम्हाला तुम्ही समतेचा धडा दिलात.
महाराज, तुम्ही तुमच्या कुमार वयात दिलेला लढा आम्हाला हे शिकवतो की जर तुमच्यात जिद्द आणि लढाऊ वृत्ती असेल तर वय हे फक्त नावापुरते असते.
महाराज, तुम्ही साम्राज्य उभे करत असताना ज्या पद्धतीने अठरा पगड जातींचे लोक एकत्र जोडले, त्याला मोल नाही. तुमच्या या कृतीमुळे आम्हाला हा धडा मिळतो की बंधुत्व जपत पुढे गेले पाहिजे.
महाराज, तुम्ही गड-किल्ले लढताना तुमच्या तल्लख बुद्धीचा वापर करून शत्रूच्या बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि मगच हल्ला केला. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की कोणतीही गोष्ट नीट समजून घेतल्याशिवाय आणि तिचा अंदाज घेतल्याशिवाय आपण आपले कार्य करू नये.
महाराज, तुम्ही गड-किल्ले जिंकताना आपल्या मावळ्यांसोबत एकजुटीने दिलेला लढा आणि स्वतः रणांगणात उतरून शत्रूला हरवल. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की ownership घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपले कार्य करावे.
महाराज, तुमच्या बोलण्यात एक प्रेम, आपुलकी आणि समोरच्याबद्दल नितांत आदर होता. यावरून आम्हाला हे कळते की आपली वाणी नेहमी आदरपूर्वक ठेवली, तरच आपल्याला माणसे जोडता येतात.
महाराज, स्वराज्य स्थापन करताना तुम्ही कोणत्याही धर्माविरुद्ध न लढता अन्यायाविरुद्ध लढा दिलात. यावरून आम्हा सर्वांना हे कळते की जिथे अन्याय होईल तिथे विरोध करावा, पण त्यात धर्म आणू नये.
महाराज, तुमचे मावळ्यांवरील प्रेम, त्यांना दिलेला सन्मान आणि त्यांच्या साठी तुम्ही जीव देण्याची तयारी दाखवली हे वाचून आम्ही खूप भावुक झालो. यावरून आम्हाला हे कळते की खरी मैत्री कशी जपावी.
महाराज, तुम्ही जेव्हा अफजलखानाचा वध केला, तेव्हा तुम्ही हे दाखवून दिले की शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते. यावरून आम्हाला हे समजते की संकटांचा सामना करताना शक्तीपेक्षा युक्तीने करावा.
महाराज, तुम्ही तुमच्या दरबारात जो न्याय केला त्यावर जनता अत्यंत समाधानी असायची आणि तुमच्या राज्यात राहण्याचा त्यांना अभिमान वाटायचा. म्हणूनच तुम्हाला ‘जाणता राजा’ म्हटले जाते. तुमच्या या कृतीवरून आम्हाला हे शिकता येते की आपण आज ज्या पदावर आहोत, त्या पदावर असताना आपण प्रामाणिकपणे आणि धोरणानुसार काम केले तर नककल आपल्यासोबतची मंडळी आपल्याला सन्मान देतील.
महाराज, तुम्ही जेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना आपल्या सोबत या असे सांगण्यासाठी गेलात, तेव्हा तुम्ही राजा म्हणून नव्हे तर मैत्रीचा हात पुढे करण्याच्या दृष्टिने गेलात आणि त्यामुळेच तुम्ही बाजीप्रभू देशपांडेंचा विश्वास जिंकला. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण स्वतः पुढाकार घेऊन घट्ट मैत्री करू शकतो.
महाराज, तुम्ही जेव्हा गड-किल्ले जिंकले, तेव्हा तिथल्या कोणत्याही स्त्रीवर अन्याय होऊ दिला नाही आणि तिला सन्मानच दिला आणि तुमच्या स्वराज्यात सर्व स्त्रिया सन्मानाने जगत असत. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण सर्वांनी स्त्रियांचा मान राखला पाहिजे, त्यांना बंधनात न ठेवता स्वातंत्र्य दिले पाहिजे.
महाराज, तुम्ही स्वराज्यात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समजून घेतले, त्यांना योग्य सन्मान दिला आणि लढण्यासाठी प्रेरित केले. यावरून आम्हाला हे कळते की जातिवाद न करता सर्वांनी एकत्र येऊन आपले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे.
महाराज, तुम्ही जेव्हा आग्र्याला गेलात, तेव्हा ज्या पद्धतीने अकबराला उत्तर दिले त्यावरून तुमचा स्वाभिमान आणि तुमचे धाडस स्पष्ट दिसते. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपला स्वाभिमान गमावू नये आणि विरोध करण्याचे धाडस ठेवले पाहिजे.
महाराज, तुम्ही जे मावळे घडवले आणि त्यांना जो आदर दिलात, त्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता स्वतःचे बलिदान दिले. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की समोरच्या व्यक्तीला आपलेपणा आणि योग्य तो आदर दिला, तर आपण जीवनात कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो.
महाराज, तुमच्या जीवनात अनेक आव्हाने आली, अनेक मावळे लढताना तुम्हाला सोडून गेले, पण तुम्ही न खचता तुमचा लढा चालू ठेवला आणि स्वराज्य स्थापन केले. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी आपले कार्य चालू ठेवले पाहिजे.
महाराज, जेव्हा तुमच्या बालपणीचा मित्र तानाजी मालुसरे लढताना धारतीर्थी कोसळला, तेव्हा तुमचे अश्रू अनावर झाले आणि त्या वेळी तुम्हाला झालेल्या वेदना आम्हाला समजण्याच्या पलीकडच्या होत्या. इतक्या दुःखात असतानाही तुम्ही जिंकलेल्या गडाला ‘सिंहगड’ हे नाव देऊन तुमच्या मित्राला अजरामर केले. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण आपल्या माणसाचा सन्मान असा करावा की येणाऱ्या पिढ्यांनीही त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आणि त्यांना स्मरण केले पाहिजे.
महाराज, तुमच्या गनिमी काव्यामुळे तुम्हाला लढाया जिंकण्यासाठी नेहमीच योग्य दिशा मिळाली. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की कोणतीही गोष्ट नियोजन करूनच केली पाहिजे, तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो.
महाराज, तुमच्या दरबारात काही लोक तुमच्याबद्दल कट-कारस्थान करत असत, पण तुम्ही त्यांना योग्य ओळखून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत होता. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपल्या आजूबाजूला आपलेच लोक शत्रू असू शकतात, त्यामुळे सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
महाराज, तुमचा राज्याभिषेक जेव्हा झाला, तेव्हा गादीवर बसण्याआधी तुम्ही सर्व मावळ्यांचे स्मरण केले आणि त्यांना आदराने वंदन केले, मगच गादीवर विराजमान झालात. यावरून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा आपल्या यशामागे ज्यांचा सहभाग असतो त्यांना स्मरण करून आपले कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे.
महाराज, तुम्ही आम्हा सर्वांना खूप काही शिकवून गेलात आणि तुमच्या जीवनाचा विषय आला की अंगावर शहारे येतात. महाराज, आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या शिकवणीची खूप गरज भासते आहे. काही लोक चुकीच्या मार्गाने विचित्र गोष्टी करत आहेत, आणि स्वराज्यात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने होताना दिसतात हे पाहून वाईट वाटते. महाराज, तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणा आहात आणि तुम्ही पेटवलेली स्वराज्याची ज्योत कायम आमच्या मनात राहील. तुमची शिकवण, तुमचे धाडस आणि तुमचा त्याग आज इतक्या वर्षांनीही आमच्या हृदयात आहे. आणि आम्ही येणाऱ्या पिढ्यांना तुमच्या त्यागाबद्दल धाडसिपणा बद्दल नक्की शिकवून त्यांचे आयुष्य समृद्ध करू.
महाराज, आज तुम्ही हयात नाही, पण मला एक किस्सा सांगावासा वाटतो. माझा पुतण्या रेदान तिसरीत शिकतो आणि त्याला तुमच्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटतो, तेव्हा तो नेहमी मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगण्याचा हट्ट करतो. महाराज, तुम्ही आमच्या मनातून कधीच जाणार नाही आणि ही ज्योत नेहमी पिढ्यान्पिढ्या पेटती राहील.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩