11/04/2025
*आपले हात आमची साथ*
आज यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठान मुंबई येथे मंडळाचा ६५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश आणि व्याप्ती पाहता प्रत्यक्षात कार्यक्रमाची सांगता ज्या प्रकारे झाली त्यामुळे प्रस्तुतचा कार्यक्रम हा आजअखेर मंडळाने घेतलेल्या सर्व कार्यक्रमातील अग्रेसर असा कार्यक्रम म्हणावा लागेल कारण या कार्यक्रम प्रसंगी दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाचे सर्वेसर्वा नामदार उदयजी सामंत मंत्री महोदय तसेच प्रधान सचिव उद्योग - डॉ.पी अनबलगन या दोघांची एकाच व्यासपीठावर एकत्र उपस्थिती आणि ती देखील मंडळाच्या वर्धापन दिनी हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल.
प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.आजच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाचे प्रचार प्रसिद्धी मध्ये विशेष उल्लेखनीय काम करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री बिपिनजी जगताप सर यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच योजना विषयी आणि खातेनिहाय केंद्रांविषयी सविस्तर चर्चा घडविण्यात आली. या चर्चेच्या माध्यमातून मंडळाचे अंतरंग उकलण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मध संचालनालय महाबळेश्वर आणि हातकागद प्रशिक्षण संशोधन तथा उत्पादन संस्था पुणे यांच्या कार्याचा ऊहापोह करण्यात आला सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नित्यानंद पाटील सर यांनी हातकागद निर्मिती,हात कागदाची शाश्वतता आणि हात कागदातील भविष्यातील संधी याचे फार समर्पक आणि सुंदर असे समालोचन केले. त्यांच्या वक्तव्यातून आपले कर्तव्य जबाबदारपणे पार पाडणारे अधिकारी हे मंडळाकडे कमी नाहीत याची ख्याती आली तसेच अंबर चरख्याच्या माध्यमातून नागपूर येथे खादीचे सोलर चरख्याच्या माध्यमातून खादी उत्पादित करणे किती अत्यावश्यक आहे याची सर्वांना जाण करून देणारे मंडळाचे जाणकार आणि हुशार व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप जी चेचरे सर यांनी आपल्या प्रयत्नातून स्थापन केलेल्या संस्थेविषयी सर्वांगीण माहिती दिली प्रसंगी खादी व ग्रामोद्योग आयोग राज्य निदेशक श्री योगेश जी भामरे यांना मंडळासाठी काही जाचक अटी नियम शिथिल करण्याविषयी विनंती करण्यात आली जेणेकरून मंडळ देखील खादी आयोगाच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात काम करू शकेल आणि पर्यायाने खादीचा सर्वांगीण विकास घडू शकेल.याच वेळी मंडळाचे ज्येष्ठ अधिकारी आदरणीय सुधीर केंजळे सर यांनी देखील मंडळाची उपयुक्तता अगदी समर्पक मांडली.
मंडळाच्या नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या आदरणीय गीतांजली बाविस्कर मॅडम यांनी देखील या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन तसेच मुद्देसूद नियोजन याचे बारकावे त्यांनी स्वतःहून जाणून घेतले आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यक्रम राबविला आणि तो यशस्वी देखील घडवून दाखविला.
आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी स्वतःची संकल्पना स्पष्ट केली आणि भविष्यात खादीसाठी जे काही करायचे आहे त्याची जंत्री वाचून दाखवली. थोडक्यात एक उत्तम प्रशासक म्हणून पदभार आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या प्रकारे आपली उद्योगनीती अथवा कार्यपद्धती सादर करायची असते थोडक्यात त्याचा लेखाजोखा जाहीरपणे मांडणाऱ्या आदरणीय मॅडम मंडळास लाभलेलं एक उमद व्यक्तिमत्व आहे याची आज ओळख झाली कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्री नित्यानंद पाटील सर यांचा सिंहाचा वाटा निश्चितच आहे परंतु त्याच बरोबर त्यांच्या टीमने देखील भरपूर कष्ट घेतले. मार्च अखेरीच्या लेखांच्या कामामुळे लेखा विभाग या कामांमध्ये सहभाग घेऊ शकला नाही त्याबद्दल खंत निश्चितच वाटते.
माननीय उद्योग मंत्री महोदय यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मंडळाचा केलेला उल्लेख, त्यांना खादी मुळे राजकारणात झालेला फायदा यामुळे त्यांच्या तरुणपणी त्यांची मंडळाशी जोडलेली नाळ ही किती घट्ट आहे याचे पुन्हा एकदा उदाहरण देऊन मंडळाविषयीची अस्मिता आणि आपलेपणा दाखवून दिला;भविष्यात मंडळास सर्वतोपरी झुकते माप देण्याचा व शासन दरबारी मंडळाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा स्वतःचा फार मोठा सहभाग राहील अशी त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा देखील केली.
मंडळाचे आदरणीय सभापती महोदय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष सांगताना केवळ राज्यमंत्री दर्जा हा त्यांच्यासाठी मर्यादित नसून दस्तूर खुद्द सभापती महोदय हे आपल्या मंडळाचे मंत्री आहेत तसेच त्यांच्या सर्जनशील आणि नवोन्मेष प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वाने विशेष भारावून काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी कशी असावी याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती महोदय हे आहेत याच्यावर शिक्कामोर्तब केले.आजच्या या समारंभास मंडळाचे सर्व आजी-माजी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते मंडळाच्या इतिहासात प्रथमच असा आगळावेगळा कार्यक्रम अनुभवायला मिळाला यापूर्वीही अनेक कार्यक्रम,समारंभ, शिबिरे,प्रशिक्षण वर्ग तसेच प्रदर्शने घेण्यात आली परंतु तत समयी अनेक प्रकारे गर्दी जमवण्याची गरज भासत होती परंतु आजच्या या कार्यक्रमास आसन क्षमतेहून अधिक संख्या उपस्थित होती हेच आजच्या कार्यक्रमाचे यश आहे आणि ही मंडळाची तसेच मंडळाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साठी फार मोठी उपलब्धी आहे.या कार्यक्रमाला मंचावर मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डांगर सर उपस्थित होते तर मंडळाच्या अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी स्मिता खरात मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उशीर झाल्याने माननीय सभापती महोदय यांनी स्वतः उपस्थित सर्वांचे आभार मानले.
- अमर राऊत
जेष्ठ पर्यवेक्षक मुंबई