12/03/2026
चित्रपतींचा स्वरसोहळा अण्णासाहेबांच्या आठवणींचा अविस्मरणीय प्रवास
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सभासद स्नेहसंमेलनाच्या औचित्याने साकारलेला “चित्रपतींचा स्वरसोहळा” हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक पर्वणी ठरला. सुमारे ४५० हून अधिक रसिकांच्या उपस्थितीत रंगलेली ही संध्या केवळ गाण्यांची मैफल नव्हती; ती होती भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान दिग्दर्शकाच्या कार्याचा, विचारांचा आणि आठवणींचा जिवंतपट.
कार्यक्रमाची सुरुवात प्रचार शाखेच्या सौ. चित्रा वाघ यांनी केलेल्या प्रस्ताविकाने झाली. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि व्ही शांताराम यांच्या 125 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमामागील संकल्पना आणि अण्णासाहेबांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी मनापासून मांडली.
या कार्यक्रमाचा सर्वात भावस्पर्शी आणि महत्त्वाचा भाग होता किरण शांताराम यांनी उलगडलेला चित्रपती व्ही. शांताराम बापू (अण्णासाहेब) यांच्या जीवनाचा आणि कार्याचा पडद्यामागचा प्रवास. डॉ समीरा जोशी यांनी तब्बल अडीच तासांच्या संवादातून अण्णासाहेबांच्या आयुष्यातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर उभे केले.
अण्णासाहेब केवळ एक दिग्दर्शक नव्हते, तर ते एक विचारवंत, प्रयोगशील कलावंत आणि समाजाशी संवाद साधणारे निर्माते होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटामागे एक सामाजिक आशय, एक प्रयोगशील दृष्टी आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कलात्मकता असायची. किरणजींनी सांगितलेल्या आठवणींमधून अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, कामावरील निष्ठा आणि शिस्त यांचा प्रत्यय वारंवार येत होता.
चित्रपटाच्या सेटवर अण्णासाहेबांची शिस्त किती काटेकोर असायची, कलाकारांवर त्यांचा किती विश्वास असायचा आणि एका दृश्यासाठी ते किती मेहनत घ्यायचे हे अनेक प्रसंगांतून उलगडले. एखाद्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी फाउंटनचा अचूक क्षण साधणे, रंगीत पाण्याच्या दृश्यांचे टायमिंग जुळवणे, प्रकाशयोजनेसाठी तासन तास प्रतीक्षा करणे किंवा कलाकारांकडून हवे तसे भाव मिळवण्यासाठी अनेक वेळा रिहर्सल घेणे
नवरंग मधील गाण्यासाठी त्यांनी हत्ती विकत घेतला, स्त्री मधील साहसी चित्रीकरणासाठी सर्कसमधून सिंह कसे भाड्याने आणले, त्यांच्याबरोबरचे शॉट्स कसे घेतले अशा अनेक रोचक गंमती सांगितल्या, अनेक रंजक किस्स्यांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
किरणजींनी सांगितलेल्या या पडद्यामागील कथा म्हणजे जणू अण्णासाहेबांच्या सर्जनशीलतेची झलक होती. प्रत्येक गाण्यामागे, प्रत्येक दृश्यामागे असलेली त्यांची परिपूर्णतेची धडपड आणि कलेप्रती असलेली अपार निष्ठा या गोष्टी स्पष्टपणे जाणवत होत्या.
तितक्याच प्रेमाने त्यांनी अण्णासाहेबांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक आठवणी सांगितल्या. घरातला त्यांचा साधेपणा, कुटुंबीयांशी असलेला जिव्हाळा, कलाकारांवर असलेला विश्वास आणि कामाबद्दलची अखंड तळमळ या सगळ्यांमुळे अण्णासाहेब केवळ एक महान दिग्दर्शक नव्हते, तर एक मोठे माणूस म्हणूनही उभे राहतात.
या आठवणींना सुरेल रंग चढवला तो कार्यक्रमातील गायकांनी.
जय आजगावकर यांचा तरुण, दमदार आणि अभिव्यक्तिपूर्ण आवाज, तसेच पारल्याचा परिचित आणि गोड आवाज सोनाली कर्णिक आणि माधुरी करमरकर यांच्या मधुर गायनाने सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
वादनाची सुरेल साथ दिली अभिजीत सावंत, सागर साठे, चेतन परब आणि प्रभाकर मोसमकर यांनी. त्यांच्या उत्कृष्ट वादनामुळे कार्यक्रमातील प्रत्येक गीत अधिक प्रभावी ठरले. संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन – प्रशांत लळित यांनी अत्यंत समर्पक आणि प्रभावी पद्धतीने केले.
कार्यक्रमाची सूत्रधार आणि संवादिका डॉ. समीरा जोशी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रसिकांना गुंतवून ठेवणाऱ्या शैलीत निवेदन केले. त्यांच्या सुबोध मांडणीमुळे कार्यक्रमाला एक सुंदर सलगता लाभली.
गाणे, आठवणी, संवाद आणि इतिहास यांचा असा अप्रतिम संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. या कार्यक्रमाने केवळ मनोरंजन केले नाही, तर उपस्थितांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात घेऊन जाण्याचे काम केले.
कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे यांच्या संभाषणाने झाला.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा झालेला हा सभासद स्नेहसंमेलनाचा स्वरसोहळा सर्वांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील.
अण्णासाहेबांच्या कलेला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या अमूल्य परंपरेला अभिवादन करणारा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.
काळ बदलतो, पिढ्या बदलतात
पण अण्णासाहेबांनी उभा केलेला कलात्मकतेचा आणि मूल्यांचा दीप आजही तितक्याच तेजाने प्रज्वलित आहे.
Uday Tardalkar Ratnakar Tardalkar Alok Hardikar Lokesh Tardalkar Jui Bag Kelkar