22/06/2023
भारतावर कोणी राज्य केले? या प्रश्नाचं उत्तर जोवर "मुघल" आणि "ब्रिटिश" हे येत राहणार तोवर आपण मानसिक दृष्ट्या गुलामगिरीतच आहोत हे लक्षात घ्या.
भारतावर नंद घराण्याने राज्य केले, शुंगांनी केले, मौर्यांनी केले, महामेघवाहन, गुप्त, चोल, पल्लव, कदंब, चेर, पांड्या, सातवाहन, यादव, शिलाहार, विजयनगर, राष्ट्रकूट, चालुक्य, सोळंकी, जाट, राजपूत, बुंदेले, आहोम, शीख आणि मराठ्यांनी राज्य केले हे आपण येत्या पिढ्यांच्या मनावर ठसवत नाही तोवर ही मानसिक गुलामगिरी जाणार नाही.
ही मला लक्षात आली तितकीच नावं. भारतभर अशी शेकडो लहानमोठी इतर राज्ये - साम्राज्ये होती. महाभारतात ज्या ज्या राज्यांचा उल्लेख आहे त्यांचे अस्तित्व खरंच होते. कुरु, पांचाल, मगध, मत्स्य, कलिंग, गांधार, कठ, मल्ल, किरत, अंग ही राज्ये अस्तित्वात होती. आपण यांना केवळ महाकाव्य म्हणून बाजूला सारू शकत नाही.
माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बरोबर काम करणारी एक छोटू (जी कॉलेजमधून जेमतेम दीड दोन वर्षांपूर्वी बाहेर पडली आहे) काही दिवसांपूर्वी गप्पा मारत होतो. गप्पांचा रंग किंचित "वाद" नामक प्रकाराकडे झुकू लागला. अखेर तिला विचारलं "मला पाच मुघल बादशहांची नावे सांग". मग अडखळत अडखळत जरा आठवत दोन मिनिटांनी तिने बाबर ते औरंगजेब असा खडतर प्रवास पूर्ण केला. तिला म्हणालो आता विजयनगरच्या तीन राजांची नावं सांग. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. म्हणालो बरं एका राजाचं नाव सांग. तिने नकारार्थी मान हलवली. तिला विचारलं "बाहेरून आलेले मुघल तुला सांगता येतात आणि याच मातीमधल्या एका बलाढ्य आणि सोन्याचांदीच्या नद्या वाहव्यात इतकं श्रीमंत साम्राज्य कोण चालवत होतं त्यातल्या एका राजाचं नाव माहीत नाही?" ती पटकन म्हणाली "पण आम्हाला जे शिकवलं ते लक्षात आहे. विजयनगर हे नाव माहिती आहे पण राजे वगैरे माहीत नाहीत."
यात तिची चूक नाही. आपणच आपल्या पिढ्यांना मुघल एके मुघल आणि मुघल दुणे ब्रिटिश शिकवलं त्यामुळे ही पिढी तयार झाली आहे. आपल्याला मुघल, ब्रिटिश वगैरे इतिहास दडपण्याची काहीच गरज नाही तो आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. प्रश्न त्यांच्या बरोबरीने इथल्या मातीत किती प्रचंड साम्राज्य उभी राहिली, उन्नतीस चढली आणि ध्वस्त झाली हे सांगणे आवश्यक आहे. "भारताचा आणि हिंदूंचा इतिहास हा आक्रमणांचा आणि पराभवांचा इतिहास आहे" ही पराभूत मानसिकतेतून आलेली न्यूनगंडाची खोल रुजलेली भावना मनातून उपटून फेकून देणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर -
जो जो मागे आला आसुर,
शक्तीच्या की भरावरी,
भारतीय यज्ञाश्व नाचला,
त्याच्या त्याच्या उरावरी।
कोठे आज ते शक वा बर्बर?
बाल्हीकही वा हूण कुठे?
भारत जठराग्नीत जळोनी,
भस्म जाहले द्रुत ते - ते।
- सौरभ वैशंपायन.