06/08/2024
काल मूठभर आंदोलक, जे स्वतःला मराठा आंदोलक म्हणवून घेतात त्यांनी सोलपूरच्या राज ठाकरेंच्या दौऱ्यात त्यांच्या हॉटेलच्याबाहेर निदर्शनं करायचा प्रयत्न केला. असं काहीतरी होणार याची चुणूक आषाढी एकादशीला शरद पवारांनी उगाच स्वतःवर चिखल ओढवून घेत जो प्रकार केला तेंव्हाच जाणवलं.
राज ठाकरेंनी आषाढी एकादशीला विठ्ठलाला साकडं घालणारी जी एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी महाराष्ट्राला जातीपातीच्या चिखलातून बाहेर काढा आणि ते हे देखील म्हणाले की महाराष्ट्रात काही लोकं जातीजातीत विष कालवण्याचं काम केलं जात आहे. आता यात कुठेही शरद पवारांचं नाव नव्हतं पण पवारांनी पत्रकार परिषदेत काही आशाळभूत पत्रकारांकडून या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया विचारायला लावली. आणि पवारांनी स्वतःला त्यात ओढून घेतलं हे करताना पवार हे जातीयवादी आहेत हा राज ठाकरेंचा आरोप त्यांनी जवळजवळ मान्य देखील केला.
पवारांनी हे का केलं याला कारण दोन...
कारण १) राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सध्यातरी एकमेव नेते आहेत जे मराठा-ओबीसी-दलित असा कुठलाही भेद त्यांना मान्य नाही. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी माणूस आहे असं मानणारा नेता.
पवारांना महाराष्ट्र एकसंध करणारा एकही माणूस या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नको आहे... महाराष्ट्र जितका विभागलेला, दुभंगलेला राहील तितकं पवारांचं राजकारण फुलेल. यात राज ठाकरे हेच अडथळा ठरतील हे हेरून पवारांनी त्यांच्याशी लपूनछपून लढाईला सुरुवात केली
कारण २) पवार हे सगळ्यात जास्त जातीयवादी नेते आहेत हे उघडपणे म्हणणारा आणि त्यांचा जिथे आदर तिथे आदर पण जिथे पवार चुकतील तिथे त्यांना चार शब्द सुनावणारा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. हे पवारांना सहन होत नाहीये.
यातून आजचा थिल्लर प्रकार शरद पवार आणि त्यांच्याभोवती लाचारीने फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केला हे नक्की. पवारांना मराठ्यांबद्दल कधीच प्रेम नव्हतं, उलट असलाच तर द्वेष होता हे मी स्वतः मराठा असल्यामुळे खात्रीने सांगतो. उच्चकुलीन मराठा किंवा ९६ कुळी मराठा पवारांना किंमत देत नाही आणि कुणबी मराठा जो कष्टकरी मराठा आहे त्याच्या घामाचा वास कधीच सहन झाला नाही. बांधावरचं राजकारण पवारांना समजतं असं चित्र पसरवलं जात असलं तरी पवारांना फक्त 'भांडणांवरचं राजकारणच' जमतं हे खरं आहे.
जेम्स लेन प्रकरणावरून महाराष्ट्र दुभंगवणारे पवारच, जातीवरून फडणवीसांना असो की राजू शेट्टींना हिणवणारे पवारच. आणि तरीही पवारांचा दावा हा की मी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरोगामी विचारवंत नेता.
बारामतीचं काकडे घराणं- बीडचं मुंडेच घराणं- बीडचंच क्षीरसागर घराणं- साताऱ्यात अभयराजे विरुद्ध उदयनराजे- वसंतदादा पाटील घराणे- मोहितेपाटील घराणं-राजळे घराणं- तटकरे कुटुंबीय अशी घराणी पवारांनी तोडली. आता त्यांना मराठा समाज तोडायचा आहे. ब्रिगेडी छाप संघटनांना ताकद द्यायची, त्यांच्या नेत्यांना आश्वासनं द्यायची पण त्यांना कधीही राजकारणात येऊ द्यायचं नाही, उदाहरण प्रवीण गायकवाड, दरवेळेस प्रवीण गायकवाडांना खासदारकीचं तिकीट मिळवून देणारे पवार तिकीट कधीच मिळू देत नाहीत.
महाराष्ट्राचं सत्तेचं राजकारण पवारांनी स्वतःभोवती राहील असं गेली ४५ वर्ष तरी पाहिलंच. पण ज्या पवारांना साधं बारामतीचे रेल्वे जंक्शन करून घ्यावं, इथून ट्रेन्सचं जाळं पसरावं किंवा पुणे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट करून घ्यावा असं नाही वाटलं किंवा नाही जमलं तो कुठला विकासपुरुष ? महाराष्ट्रातील शेती तशी बेभरवश्याची, त्याला उद्योगांची जोड द्यायची तर त्यात पवारांना कधीच इंटरेस्ट नाही, कारण उद्योगधंदे एकदा का आले की बहुजन समाजातील मुलं ही आर्थिकद्रुष्ट्या स्वावलंबी होतील आणि त्यांना चूक काय बरोबर काय हे कळायला लागेल आणि अशी मुलं फूट पाडण्याच्या राजकारणासाठी वापरता येणार नाहीत. मुळात मर्यादित वकूब असलेल्या पवारांना महाराष्ट्र, 'महा'राष्ट्र व्हावा हेच वाटत नाही आणि यामुळेच एकसंध आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघणारा राज ठाकरे पवारांना झेपत नाहीये.
काल रात्री ज्या मॅच्युअर पद्धतीने राज ठाकरेंनी आंदोलकांना हॅन्डल केलं, मुळात सामोरे गेले हे ना पवारांनी कधी केलं ना उद्धव ठाकरेंनी. पवारांच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर त्यांनी समाजात दोन घटक एकमेकांची डोकी कशी फोडतील हे पाहिलं असतं आणि उद्धव ठाकरेंनी हंबरडा फोडला असता. कारण महाराष्ट्राचं जे वाटोळं झालं त्या पापाचे धनी दोघेही आहेत.
पण कर नाही त्याला डर कशाला या मनोवृत्तीने राज ठाकरे ज्या पद्धतीने काल सामोरे गेले, त्यावरून त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात ते फिरलेली माथी शांत करतील, त्यांना वास्तवात आणतील हे दिसायला लागलं आहे. एक मराठा-लाख मराठाची घोषणा एक मराठी-कोट्यवधी मराठी करण्याची ताकद फक्त राज ठाकरेंकडे आहे, फक्त पवार आणि उद्धव नावाच्या दुतोंडी सापांपासून त्यांनी सावध रहावं.
जय शिवराय, जय एकसंध महाराष्ट्र
अनिकेत थोरात
एक मराठी-कोट्यवधी मराठी