18/07/2025
*काश्मिरीयत*
लेखिका - सुप्रिया राज
रसग्रहण - मंगेश गोगटे
जम्मू काश्मीर म्हटले कि सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात येते तेथील भीषण वर्णन, दहशदवाद, काश्मीर बंद ची आवाहने, दगडफेक करणारे तरुण, बुरख्यात वावरणाऱ्या बायका, AK 47 मिरवणारे टेररिस्ट, व हे कंट्रोल करायला जीवाची बाजी लावणारे मिलिटरी, बॉर्डर सिक्युरिटी व स्थानिक पोलिसांचे जवान.....
आपल्या दृष्टीने काश्मीर इतकेच आहे.
लेखिका सुप्रिया राज 2014 साली फेमिली ट्रिप साठी काश्मीर मध्ये दाखल झाली तेव्हा तिची सुद्धा काश्मीर बद्दल ची इमेज काही वेगळी नव्हती.
पण त्या थोड्या दिवसाच्या ट्रिप मध्ये तिला असे जाणवले कि मीडिया मधून ~दिसणारी~ दाखवली गेलेली प्रतिमा आणी वास्तव अगदी सेम नाही.
तेव्हा ती निर्णय घेते काश्मीर च्या टुरिस्ट जागा सोडून LOC च्या जवळच्या गावात जाऊन खरे काश्मीर स्वतः जाणून घेण्याचा.
चाळीशीतील मराठी बाई जगातील सर्वात अशांत सीमेवर एकटी प्रवास करणार ही कल्पनाच इतकी विलक्षण किंवा विचित्र होती कि सुप्रिया ला कोणी उत्तेजन दिले नाही.
सर्वांनी तिथे जाणे कसा मूर्खपणा आहे. तेथील रानटी मुस्लिम पुरुष तिला फाडून खातील वैगरे सांगून तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला.
पण जेव्हा इरादे बुलंद असतात तेव्हा कुठलेही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही.
2015 सालच्या च्या उन्हाळात सुप्रिया जेव्हा श्रीनगर च्या फ्लाईट मध्ये चढली तेव्हा तिच्या सोबत होती चार कपडे असलेली झोळी, चॉकलेट्स ने भरलेली पिशवी फक्त 5000 रुपये असलेली पर्स आणी दुर्दम्य इच्छाशक्ती बस्स!
पुढच्या दोन महिन्यात काही ओळख पाळख नसतांना, सोबत फार पैसे नसतांना लेखिका आपला सोलो ट्रेव्हल कसा पूर्ण करते?
तिला काय अडचणी येतात?
सेन्सेटिव्ह बॉर्डर एरियात जातांना परवाने मिळवण्यासाठी काय खटाटोप करायला लागतो, अनोळखी लोकांकडून तिला काय अनुभव मिळतो?
खिशात फार पैसा नसतांना ती प्रवास कसा करते?
ज्या भागात रहायची हॉटेल्स तर सोडा पण खाणावळी पण नाहीत त्या भागात तीला आसरा कोण देतो, खाण्या पिण्याची व्यवस्था कशी होते हे जाणून घेण्यासाठी एकदा *काश्मिरीयत* वाचायला हवे
लेखिकेने फार सोप्या शैली मध्ये पुस्तक लिहिले आहे, गप्पा मारव्या अशी भाषा आहे.
अलंकारिक जड भाषा वापरायचा मोह आवरला आहे.
एखाद्या व्यक्ती विषयी चे आधीचे अंदाज चुकले तर ते सुप्रिया ने मोकळेपणाने कबूल केले आहे.
काही तुरळक अनावस्था प्रसंग मिर्च मसाला न लावता सांगितले आहेत.
काही ठिकाणी झालेली फजिती पण कबूल केली आहे.
ठिकठिकाणी आलेले माणुसकीचे प्रसंग वाचताना आपले डोळे पाणावतात.
थोड्या दिवसाच्या ओळखीत जन्म भराच्या सुखद आठवणी देणारे लोकं व त्यांची ताटातूट होतांना लेखिकेला झालेले दुःख आहे आपल्याला पण जाणवते.
गुरेज ला जायचा अट्टाहास, त्या साठी घेतलेले कष्ट, मिलिटरी ला वाटलेला संशय, पाकिस्तान ची एजन्ट असावी असे वाटून त्यांनी ठेवलेली पाळत वैगरे प्रसंग वाचतांना आपण थरारून जातो.
लेखिके सोबत आपण सुद्धा दुर्गम काश्मीर च्या खोऱ्यात प्रवास करत आहोत असा फील येतो.
पुस्तक वाचून खाली ठेवतो तो वर काश्मीर बद्दल च्या आपल्या कल्पना अमुलाग्र बदललेल्या असतात.
माणुसकी चा धर्म सर्वात श्रेष्ठ व प्रेमाची भाषा जगात कुठेही समजली जाऊ शकते हाच संदेश देते *काश्मिरीयत*