20/08/2016
सांगा, सांगलीने काय घोडं मारलंय?
- - अजित झळके [email protected]
देवेंद्रजी, काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात तुमच्या पक्षाला लोकसभेचा उमेदवार मिळताना नाकीनऊ यायचे. त्याच सांगलीने खासदार संजय पाटील यांना मोजता येईनात इतकी मते दिली. लोकांनी ‘कमळ’वर ‘छप्पर फाडके’ विश्वास दाखवला. खाते खोलताना दमछाक व्हायची तिथे चार-चार आमदार दिले. त्या बदल्यात तुम्ही सांगलीला काय दिले? मंत्रिपदासाठी लाचारी..! विकासाचा दुष्काळ...! उसना पालकमंत्री घेऊन आम्ही विकासाची स्वप्ने पाहायची का? पुणे, कोल्हापूरनंतर सांगलीला विकासाच्या ‘टेक ऑफ’ची संधी आम्ही शोधतोय, सोलापूरला स्मार्ट सिटीत घेतलं, सांगलीनं काय घोडं मारलंय! आजही विकासापासून मैलो दूर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. १२) इस्लामपुरात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या लग्नासाठी येत आहेत. त्यानंतर रायगाव (ता. कडेगाव) येथे भाजपचा शेतकरी मेळावा होतोय. तो शेजाऱ्याच्या लग्नात उरकलेला मेळावा ठरू नये इतकीच अपेक्षा आहे. त्यामुळे काही मुद्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणे महत्त्वाचे ठरते.
देवेंद्रजी, इथल्या शेतकऱ्यांना सरकार आपले वाटावे, असे आपण काय केलेय, हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणाल, ‘‘शेतमालाची नियमनमुक्ती केली.’’ पण, नियमनमुक्त बाजाराचा लाभ घ्यायला जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरजेचा पूर्व भाग, तासगावचा बराच भाग दुष्काळी आहे. तिथे काही पिकायला नको का? आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? काही पिकवायचं म्हटलं तर कॅनॉलचं पाणी पाहिजे. तुम्ही म्हणता, ‘पैसे भरा तरच पाणी देऊ.’ पुराचे पाणी कर्नाटकात वाहून चालले. ते उचलून दुष्काळी भागातील तलाव भरायला मागे का हटता? फळबागा जगतील, भूजल पातळी वाढेल. चारा पिकेल, जनावरे जगतील. छावण्यांवर पोसलेले गावटगे मस्तवाल होणार नाहीत. मिरजेतून लातूरला पाणी देताना तत्परता दाखवली. जतनं काय घोडं मारलंय?
कृष्णा नदीतून १४० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले. एका टीएमसी पाण्याची किंमत सव्वादोन कोटी आहे. तुमचा अर्थखात्यातील अभ्यास दांडगा. सारे म्हणायचे, भाजपचं सरकार आलं की देवेंद्र अर्थमंत्री होतील. तुम्ही थेट मुख्यमंत्री होऊन राहिले..! तुम्ही परवाच विधानसभेत म्हणालात, ‘‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.’’ सांगली आपल्या महाराष्ट्रातच आहे, याची आठवण करून द्यावी वाटते. इकडे येतच आहात तर दुष्काळातील शेतकऱ्याचे अश्रू पाहा. ओसाड माळावर शेती पिकवतानाच्या यातना बघा. टेंभू, ताकारी, म्हैसाळचे पाणी शिवारात खेळवताना शेतकरी सर्कस करतोय, तेही बघा. पिकते किती, विकते किती, पदरात पडते काय? अर्थतज्ज्ञ म्हणून हिशेब घाला. पश्चिम महाराष्ट्रात आबादी-आबाद असा गोड गैरसमज आहे. तुमचे विदर्भप्रेम नामंजूर नाही, पण आम्हाला ‘कारटं’ समजू नका. निसर्गाने इथल्या माणसाला पाण्यासाठी लाचार केलेय, तुम्ही निसर्गापेक्षा निष्ठूर होऊ नका. जतची तहानलेली ४२ गावे कर्नाटकात निघाली, तरी तुम्ही गप्प कसे?
खरं तर भाजपच्या इथल्या खासदार, आमदारांनी आवाज उठवायला हवा. ते पूर्वी पक्षात राहुन ‘गेम’ करायचे. आता तोंडे शिवलीत. तुमचे उपकारच तितके मोठे... वाहत्या गंगेत साऱ्यांनी हात धुवून घेतले. ‘निष्ठावंतां’ना बाजूला ठेवून तुम्ही आयत्यावेळची भरती काढली. त्या उपकाराने ते काही बोलायचे नाहीत. बाकी सारे ‘प्रतीक्षा में है’... महामंडळाचा दिवा त्यांना हवाय. पूर्वी कॅबिनेट बैठकीत सांगलीचा आवाज घुमायचा. आर. आर. आबा दमात घेऊन मुद्दा रेटायचे, पतंगराव रेटून निधी आणायचे, जयंत पाटील यांचा हातखंडाच होता. भले मतदारसंघापुरता या साऱ्यांनी विचार केला, पण त्यातून काहीतरी घडत होते. सरकार आहे, असे वाटत होते. आता कोणाचा कोणाला पायपोस नाही. इथे सत्तेच्या लाभासाठी कपडे फाडले जाताहेत. तुमचे निष्ठावंत पक्षाच्या नावाने बोटे मोडताहेत. जुना-नवा उभा दावा मांडलाय. जनतेच्या हिताचे कोणाला पडलेय?
पुणे, कोल्हापूरचा झपाट्याने विकास झाला. राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे कोल्हापूरला हद्दवाढीची गरज आली. आमची सांगलीत अजून रांगते आहे. अजून शेरीनाला, शुद्ध पाणी, रस्ते, गटारी, डास अशा गावपातळीवरच्या समस्यांमध्ये देवेंद्रजी, सांगली अजून विकासापासून मैलो दूर गुरफटलोय. बाल्यावस्था संपेना. विकासाच्या दृष्टीने दोन पावले उचलली पाहिजेत, असे का वाटू नये? औद्योगिक वसाहत, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, पुणे-कोल्हापूरल
ा जोडणारे राष्ट्रीय महामार्ग, ही अपेक्षा अवाजवी आहे का? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात ते घडले नाही म्हणून भाजपला निवडले. दोन वर्षे झाली, पदरात काय पडले? सांगलीचा विकास आराखडा तुम्हाला मंजूर करता येईना. वाट वाकडी करून सांगलीची हेलिकॉप्टरमधून पाहणी करा. विस्तारित भागाची बेटं झालीत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेला दणका द्यावा, इतकेही आपले धारिष्ठ नाही. सांगली विकायला काढली इथल्या कारभाऱ्यांनी. तरी तुमचे सरकार हाताची घडी अन् तोंडावर बोट..! कसले साटेलोटे आहे? चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक व्याप आहेत. एक स्वतंत्र व खमक्या पालकमंत्री तरी येथे दिलात तरी गाऱ्हाणी ऐकण्याची तरी सोय होईल!
‘ती’ निर्लज्ज व्यवस्थेची बळी
देवेंद्रजी, राज्याचे गृहखाते तुमच्याकडेच आहे. मिरजेतील प्रकरण तुमच्यापर्यंत पोचलेच असेल. एक अबला स्त्री बलात्काराचा गुन्हा दाखल करून घ्या म्हणून पोलिसांना विनवण्या करत होती. तिला ‘फटके मारीन, थोबाड फोडीन’ असे सांगून हाकलून दिले. ती लढली, गुन्हा नोंदवला. तिची मुस्कटदाबी करायला पोलिसांनी तिच्याविरुद्धच खंडणीचा गुन्हा तत्परतेने दाखल केला. सहन न होऊन तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. कसा विश्वास ठेवायचा गृहखात्यावर? आर. आर. आबा गृहमंत्री असताना खट्ट झालं तरी तुम्ही रान उठवायचा. आता कोण बोलणार? काँग्रेस, राष्ट्रवादीवाले सत्तेच्या धुंदीतून बाहेर यायला तयार नाहीत. शिवसेनेच्या वाघाला तुम्ही सत्तेचा पट्टा बांधून दारातील खुंटीला डांबून ठेवलेय. आवाज काढणार कोण?
आठ दिवस संपले का?
देवेंद्रजी, तुम्ही कवठेमहांकाळ दौऱ्यावर आला असताना सांगली शहराच्या विकास आराखड्याच्या मंजुरीविषयी विचारले होते. तेव्हा तुम्ही म्हणाला होता, ‘‘मी मुंबईत पोचून माहिती घेतो. आठच दिवसांत खासदार संजयकाकांकडे निरोप पाठवतो.’’ ते आठ दिवस अजून संपले नाहीत का?