21/03/2020
दुष्काळ आणि साथीच्या दुर्योधनाला लोळवणारा भीमरूपी महारुद्र राजर्षी शाहू छत्रपती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहू महाराज कोल्हापूरनरेश छत्रपती कसे झाले याचा इतिहास सर्वाना माहितीच आहे. त्या खोलात जात नाही. फक्त एवढं आवर्जून सांगतो, कोल्हापूरच्या भूमीचं नशीब तिला भूपती म्हणून राजर्षी शाहू महाराजांसारखा द्रष्टा राजा लाभला.
महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि साधारण त्याच काळात कोल्हापुरातच नाही तर देशभरात भयंकर दुष्काळ पडला. तमाम रयत अन्ना-अन्नाला मोताज झाली. १८९६ चा दुष्काळ भयानकच होता. कोल्हापूर संस्थानामधली गावंच्या गावं ओस पडली. अश्यावेळी राजर्षी शांत बसते तरच नवल. नव्याने राज्यकारभार हाती घेतलेल्या या तरण्याबांड राजानं प्रशासन असं काही फिरवलं की मी म्हणणाऱ्या दुष्काळाही कोल्हापूरच्या मातीत पाठ टेकावी लागली.
महाराजांनी स्वतः राज्यभर दौरा केला, परिस्थिती समजून घेतली. अन्नाचा आणि पाण्याचा तुटवडा त्यांच्या लक्षात आला. अश्या परिस्थितीचा फायदा घेऊन धान्याचा साठमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले भाव त्यांच्या लक्षात आले. त्यांनी यावर तात्काळ उपाय म्हणून व्यापाऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर धान्य विक्री करायला भाग पाडलं. प्रसंगी तूट सहन करून धान्य विका, व्यापाऱ्यांची तूट सरकारी खजिन्यातून भरून देण्याची व्यवस्था केली. आजच्या स्वस्त धान्य दुकानांची गेलेली रया आणि तिथे होणारी लूटमार पाहिली की त्या काळात शाहू महाराजांनी उभ्या केलेल्या यंत्रणेचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.
काही व्यापाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी स्वस्त धान्य दुकानं सुरु केली. त्यांचा कारभार चोख चालेल याची यंत्रणा उभी केली. आसपासच्या संस्थानातून धान्य विकत घेतलं. ते योग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य लोकांच्या पदरात पोच केलं.
धान्य पोच होत होतं, पाण्याचं काय.
तो काळ डोळ्यासमोर आणा, आजच्यासारखे रस्ते नाहीत, गावात पाईपलाईननं- टँकरनं पाणी पोच करण्याची सोय नाही. यावर उपाय म्हणून महाराजांनी विहिरींमधला गाळ काढायला घेतला, नव्या विहिरी खोदण्याचे आदेश दिले. हे सगळं दिव्य त्यांनी सरकारी यंत्रणा आणि लोकसहभाग यातून घडवून आणलं. गावागावातल्या विहिरी यामुळं परत तरारल्या. अनेक दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न मिटला. पाणीप्रश्न कायमचा मिटावा म्हणून जागी जागी तलाव बांधले, त्याला अनेक बंधारे बांधून घेतले.
महाराजांनी बांधलेल्या धरणावर तर एक वेगळा लेख होईल. त्यांची बांधलेली राधानगरीसारखी धरणं आजही अख्या कोल्हापूर शहरांची तहान भागवत आहेत. त्यांनी बांधून घेतलेल्या दोन पुरुष उंचीच्या पाटाच्या जिवंत खुणा आजही कोल्हापूर शहरात स्पष्ट दिसतात.
दावणीची जनावरं टाचा घासून मरताना पाहण्यासारखं दुःख नसतंय, त्यासाठी महाराजांनी सरकारी खजिन्यातुन अगदी नाममात्र दरात चारा पुरवण्याची सोय केली. ज्यांना जनावरं घरात सांभाळणं जमत नाही त्यांच्या जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या. जंगलांची कुरणं जनावरांसाठी खुली केली.
दुष्काळाशी लढण्यासाठी त्यांनी दुष्काळी भत्ता सुरू केला, जागोजागी दुष्काळी कचेऱ्या सुरु केल्या, खेडोपाडी रस्ते बांधणीचं प्रचंड मोठं काम काढलं, रोजगारावर जाणाऱ्यांच्या लहान मुलांसाठी शेड उभे केले, गरीब आणि अपंगासाठी वेगळे आश्रम उभे केले. बिनव्याजी कर्ज वाटली, शेतीच्या प्रयोगांवर आणि शेती शिक्षणावर भर दिला.
या सगळ्यांचा परिपाक काय होता माहिती आहे ??
१८९७-९८ च्या दुष्काळात भारतभरात जिथं दहा लाखांपेक्षा जास्त माणसं मेली तिथं, कोल्हापूर संस्थानात एकही दुष्काळ बळी गेला नाही. का नाही या राजाला छत्रपती शिवरायांची सावली म्हणावं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
असाच प्रसंग प्लेगच्या साथीचा
१८९६ साली प्लेगच्या साथीने देशात धुमाकूळ घातला. साथीचा रोग आला की हजारो लोकांचा मृत्यू ठरलेला असायचा. एखाद्याला गाठ आली की गावकरी त्याला गावाबाहेर नेऊन टाकायचे. प्लेगने मेलेल्यांच्या अंत्यसंस्काराला गेलेला एखादा गाठ घेऊनच परत यायचा. एकाला जाळून आलं नाही तोवर दुसऱ्याची लाकडं गोळा करावी लागायची. एवढी दहशत या रोगांची होती.
गावंच्या गावं अश्या साथीच्या रोगाचा फेरा पडला की ओस पडायची. या प्लेगच्या साथीलाही महाराजांनी जबर झुंज देऊन पुरतं नामोहरम केलं.
प्लेगच्या रोगाची माहिती देणारी पत्रकं काढली त्यांच्या गावोगावी दवंड्या दिल्या. योग्य प्रबोधन केलं. घरं कशी साफ ठेवायची, अडगळ कशी दूर करायची, उंदरं कशी मारायची, ती कशी जाळायची याचं प्रशिक्षण दिलं. जी गावं लोकांनी सोडली त्या गावच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महाराजांनी घेतली. घरं निर्जंतुक करण्याची औषधं मोफत वाटली, मोकळी गावं निर्जंतुक करून घेतली.
ज्या लोकांना गावं सोडावी लागली त्यांना माळरानावर किंवा शेतात नव्या झोपड्या बांधण्यासाठी मोफत सामग्री पुरवली. गावातून आशेने शहराकडे येणाऱ्या सर्व वाटांवर तपासणी यंत्रणा उभी केली. तिथे पूर्ण तपासणी करून प्लेगचे रोगी वेगळे केले जात. प्लेगचे रोगी शोधून काढणार्यांना १०-१५ रुपयांचे रोख बक्षीस दिले जात. ज्या काळात १ रुपया १४ आण्याला १ मण धान्य मिळायचं त्या काळात १०-१५ रुपये बक्षिसी छोटी नक्कीच नव्हती.
प्लेगच्या रोग्यांसाठी कोटीतीर्थ इथे हॉस्पिटल बांधून घेतलं. महाराज स्वतः जातीनं त्या हॉस्पिटलला भेट देऊन तिथली व्यवस्था पाहायचे. पुढे १९१०-११ च्या सुमारास प्लेगचं मोठं सामूहिक लसीकरण महाराजांनी करून घेतलं. महाराजांनी स्वतः लस घेतली. श्रमाची काम करणाऱ्यांनी लस टोचून घ्यावी म्हणून त्यांना आठ आणे बक्षीस ठेवलं, त्यांच्या घरच्यांनी लस टोचून घेतली तर त्यांना चार आणे बक्षीस ठेवलं. दरबारी नोकरांना- सरकारी अधिकाऱ्यांना लसीकरण करून घेण्यासाठी पगारी सुट्टी दिली. त्याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला, अंधश्रद्धेमुळं लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या अनेकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतलं.
त्या काळात इतर संस्थानांमधली साथीच्या रोगांमुळे आणि दुष्काळामुळे झालेली विकलांग अवस्था पाहिली की शाहू महाराज दुष्काळ आणि साथीच्या रोगरुपी दुर्योधनाला लोळवणारे भीमरूपी महारुद्र म्हणूनच समोर येतात.
आज अशीच खंबीर शिवछत्रपतींची सावली अक्ख्या जगाला हवीय.
#जागर_इतिहासाचा
#पुस्तक_बिस्तक
#लोकराजा
#राजर्षी_शाहू