01/06/2026
*बेघर नागरिकांना मिळाला ‘सावली’चा आधार;*
_नागरिकांनी पुढाकार घेण्याचे सहयोग संस्थेचे आवाहन_
(आनंद गायकवाड )
कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत गुरुकृपा विकास संस्था संचालित ‘सावली’ बेघर निवारा केंद्र, डोंबिवली (पूर्व) येथे बेघर नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
उपआयुक्त (समाज विकास विभाग) सौ. कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, NULM व्यवस्थापक भागवत पठारे तसेच गुरुकृपा विकास संस्थेचे संस्थापक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवारा केंद्र कार्यरत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. ४, जे वॉर्ड परिसरात आढळून आलेल्या तीन बेघर पुरुष नागरिकांना सहयोग सामाजिक संस्थेचे संचालक आणि समाजसेवक विजय भोसले व समाजसेवक सत्यवान कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथील ‘सावली’ बेघर निवारा केंद्रात संस्थेच्या केअरटेकरमार्फत दाखल करण्यात आले. या नागरिकांना निवारा, अन्न व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शहरातील रस्ते, रेल्वे परिसर, सार्वजनिक ठिकाणे किंवा इतरत्र बेघर, निराधार अथवा मदतीची गरज असलेले नागरिक आढळून आल्यास सर्वसामान्य नागरिकांनी तात्काळ ‘सावली’ बेघर निवारा केंद्र अथवा सहयोग सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय भोसले यांनी केले आहे. समाजातील वंचित व निराधार घटकांना सुरक्षित आश्रय मिळवून देण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
बेघर नागरिकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, नागरिकांनी अशा व्यक्तींची माहिती प्रशासन व संस्थेला देऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.