13/08/2024
वर्षाताई गायकवाड अकोल्यात
बाळासाहेबांना काँग्रेसचा पाठिंबा का नाही ?
वंचित बहुजन आघाडीचे वर्षा गायकवाड यांना सवाल
मुंबई : एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी करण्याचे कारण काय ? यावर वंचित बहुजन आघाडीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीत समावेश नसतानाही बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांना पत्र लिहून लोकसभा निवडणुकीत 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महाविकास आघाडीच्या मागणीवरून वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत नागपूर, बारामती आणि कोल्हापूर मतदारसंघात पाठिंबा दिला होता. तरीही अकोल्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा का दिला नाही? दरवेळेप्रमाणे काँग्रेसने मते खाणारे उमेदवार का उभे केले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसने दलितांची मते घेतली. मग लोकसभा निवडणूक संपताच काँग्रेसच्या 10-12 आमदारांनी भाजपच्या महायुतीला मतदान करून विधान परिषद निवडणुकीत का जिंकवले ?
काँग्रेस तुम्हाला महाविकास आघाडीच्या सभांना दलित चेहऱ्याच्या नावाने आणत राहिली, पण तुम्ही सभेत एक शब्दही बोलला नाहीत. तुम्ही फक्त सॅल्मन फिश खाण्यासाठी तोंड उघडले! देशातील सर्व दलितांनी तुमच्यासारखे टोकन चेहरे व्हावे असे तुम्हाला वाटते का?
तुम्ही केलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी अचानक का थांबवली? त्या घोटाळ्यात तुम्ही आणि भाजपने मिळून मेहंदी काढली होती का?
काँग्रेसच्या कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील क्रीमीलेयरवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत का केले?
असे सवाल करत वर्षाताई गायकवाड यांच्या उत्तराची वाट संपूर्ण देश पाहत असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
---