11/07/2023
आहो-जाहो आणि अरे-तुरे...
‛आहो-जाहो’ केलं म्हणजे तुम्ही त्या व्यक्ती बद्दल आदर बाळगता आणि ‛अरे-तुरे’ केलं म्हणजे त्या व्यक्तीचा तुम्ही अनादर करता?
कधी वाटतं नाही का.. की आपण हे पुरुषप्रधान संस्कृतीची नकळत जपवणूक करतो? (मला इथं स्त्रीप्रधान संस्कृती पण आणायची नाही, समानता प्रधान चाललं) म्हणजे घरात आई, काकू, मावशी, आजी इतर घरातील सर्व स्त्रियांना आपण जवळपास सर्वच जण अरे-तुरे करतो. वडील, काका, आजोबा किंवा वडीलधाऱ्यांना इ. सर्व पुरुषांना आपण अहो-जाहो म्हणतो.
प्रश्न पडत नाही का? आईला अरेतुरे केलं तरी तिचा कधी अपमान/अनादर होत नाही...
पुरुषांनी पुरुषप्रधान संस्कृती जेवढी लाधली त्यापेक्षा जास्त स्त्रियांनी ती उत्तम रित्या जपली आणि पुढच्या पिढीला दिली. घरातच आईकडून शिकवलं जातं पुरुषला आहो म्हणायचं आणि स्त्रीला का गं, अरेतुरे...
माझ्या मणी ध्यानी नसतांना आपण एखाद्याशी अरेतुरेच्या स्वरात बोलायला किंवा कुठल्यातरी फबी पोस्ट वर कंमेंट् करताना, “तुला.....” असं म्हणलं/कंमेंट केली तरी समोरच्याचा इगो हर्ट होतो. ती व्यक्ती विचारते तुम्ही लगेच अरेतुरेवर कशे आलात, तो/ती व्यक्ती मला त्या सिंघम मधल्या जयकांत शिकरे सारखे अंगावर आल्यासारखे वाटतात..
“कुछ भी करने का लेकिन जयकांत शिकरे का ईगो हर्ट नहीं करने का..”
बर ते एखाद्याशी वाद किंवा मतभेद झाले तर “अहोजाहो” करणारी लोक कशी एकेरीवर येतात... ?
आपल्या तर्काला गोष्टी पाटल्या तरी त्या वापरण्यात आपण कच खातो. बऱ्याश्या जुन्या चालीरीती आपण अजूनही मनात कुठे तरी जपून ठेवल्यात त्या आज ही कुरवाळतो. एखादी गोष्ट आपल्या तर्काला पटल्या तर त्या रोजच्या जीवनात का वापरू नये. कमीतकमी इथे फेसबुक वर तरी... काय हरकत आहे.
बर ते फेसबुक वर हे “दादा ताई आणि भया” प्रकरण एक वेगळंच.. (फेसबुकवर पण लोक नात्यांचा पण गुंता घालत जबाबदाऱ्या कशा सांभाळतात.. छ्या बाबा)
रक्ताचे नाते जन्माने मिळालेले असतात ते बदलता येत नाही, पण मित्रमैत्रिणी आपण ठरवतो ना.. मग लहानमोठा तो कितीही वयाचा का असेना, काय फरक पडतो “अरे-तूरे” करायला... मला तरी आवडेल आपल्या पेक्षा लहान मित्रमैत्रिणींने मला “अरेतुरे” बोलायला.. अर्थात आपल्या पेक्षा वयाने मोठ्यां स्त्री-पुरुषांना “अरेतुरे” बोलायला ही...
आता एखादा/एखादी म्हणेल..
“संस्कार आहे हो आमच्यावर.. तुमच्या सारखं नाही.. ही अशी अरे तुरेची भाषा बोलायला.. ”
आणि
यावर प्रश्न पडू शकतो, “अहो जाहो केलं तर काय बिघडले”
तर मी म्हणेल, “अरे तुरे केलं तर काय बिघडले”
खरतरं वयानुसार “अहो-जावो” वापरणं हा दांभिकपणा वाटायला लागलाय.
वयाला महत्व देण्यापेक्षा विचाराला महत्व देऊ. आता कोणी काय विचार मांडले यासाठी त्याच वय पहाची गरज काय?.. 'एकेरी' म्हटल्यावर अनादर होत नाही आणि “अहो जाहो” म्हटल्यावर आदर होत नाही. मला तसं वाटत नाही. ते सगळं आपल्या मानण्यावर आहे.
🖤