01/04/2026
...आणि खांडजचा वीजपुरवठा सुरळीत झाला!
बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या सक्तीच्या भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी वीजपुरवठा खंडित असल्याने जनावरांची देखभाल, दूध काढणे, स्वयंपाक, घरकाम, विद्यार्थ्यांचा अभ्यास अशा सर्वच बाबी विस्कळीत होत आहेत. याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची नुकतीच भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
श्री. पेठकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महावितरणने एक उपाय सुचविला की, सायंकाळच्या वेळी वीजेचा वापर फक्त घरगुती कारणांसाठीच केल्यास आणि यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास वीजपुरवठा सुरळीत होऊ शकतो. खांडज ग्रामस्थांनी ही जबाबदारी स्वीकारत जनजागृती मोहीम राबवली, घरोघरी वीज सुरळीत होण्यासाठी आवश्यक सहकार्य करा असे सांगण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला. यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करुन तो महावितरणकडे सादर केला.
या ठरावाची दखल घेत महावितरणने तातडीने यावर कार्यवाही केली आणि कालपासून खांडजमध्ये सायंकाळचा वीजपुरवठा सुरळीत झाला. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गावात समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.
महावितरणने मोलाचे सहकार्य करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत केल्याबद्दल खांडज ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे खुप खुप आभार! खांडजप्रमाणे इतरही सर्व गावांना महावितरणचे असेच सहकार्य राहील, असा विश्वास आहे.
खांडजचा हा आदर्श बारामती तालुक्यातील इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. प्रत्येक गावाने असा ठराव करून महावितरण सोबत समन्वय साधल्यास लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी आम्ही सर्वजण सर्व ग्रामस्थांसोबत आहोत.
सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की, आपल्या गावातही असा ठराव करून पुढाकार घ्या. आम्ही महावितरणसोबत समन्वय साधून आपल्याला पूर्ण सहकार्य करू.
चला, आपण सर्व मिळून आपला गाव ‘प्रकाशमय’ बनवूया.
#बारामती