29/03/2022
#कोकण ला रिफायनरीची खरंच गरज आहे का?
कोकणात रिफायनरी करण्याचा राजकीय प्रयत्न चालू आहे. रिफायनरीचे पाठीराखे कोकणात मोठा प्रकल्प येण्याचे फायदे सांगत आहेत. मात्र, मोठा प्रकल्प प्रदेशाचा फायदा करतोच असे नाही, त्याहूनही, मोठा प्रकल्प कोकणच्या वातावरणीय परिस्थितीशी आणि नैसर्गिक स्थितीही विसंगत असेल, तर त्याला रेटण्याची गरज असतेच असे नाही...
पण मग कोकणच्या विकासाचे काय? थोडंसं नीट समजून घ्या...
१. रिफायनरी स्पेशियलाईज तांत्रिक प्रकल्प आहे. या प्रकल्पात होणारी गुंतवणूक भव्य आहे, पण त्यातील मोठा वाटा यंत्र सामुग्री मधील अर्थात् कॅपिटल इंवेस्टमेंट असेल. त्याचा, कोकणातील उद्योजकांना काही फायदा नाही. त्यामुळें मोठी गुंतवणूक आली तरी त्याचा फायदा नाही.
२. रोजगार: एवढा मोठा प्रकल्प नक्कीच रोजगार निर्माण करील. पण कुठले? उच्च शिक्षित तांत्रिक पदे, आपल्या पोरांना मिळणार नाहीत, कारण त्यासाठी लागणारे तांत्रिक शिक्षण आपल्या पोरांनी घेतलेले नाही. कंपनीला चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिकलेले मुंबई पुण्यातील तरूण उपलब्ध असताना, ते साध्या शिक्षणसंस्थेत शिकलेले तरूण का घेतील? त्यामुळें आपल्या पोरांना नोकऱ्या मिळतील ड कॅटेगरीच्या. अगदी डिप्लोमा, आयटीआय आणि इंजिनिअरिंग च्या मुलांना किती स्कोप मिळेल हा प्रश्नच आहे. वास्तविक, कोकणसाठी ह्या प्रकल्पातून कुठून आणि कसा रोजगार उपलब्ध होईल, ह्याचा DPR सरकारनं मागवावा. तो आलेला दिसत नाही, अन्यथा सरकारनं डेटा दिला असता...
३. ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट पर्यावरण. रिफायनरी कोकणच्या पर्यावरणाशी खेळणार नाही याची १००% गॅरंटी सरकार देऊ शकते का? पर्यावरणावर, समाजावर, अन्नसाखळीवर, रिफायनरी चे परिणाम होणार नाहीत याची १००% हमी मिळेल का? आणि उद्या काही बरे वाईट झाले तर सरकार दोषींवर कायदेशीर कारवाई करून कोकणला नुकसान भरुन देईल का? जर याचे उत्तर नाही असेल, तर विषाची परीक्षा घ्यायची कशाला? एक भोपाळ आपल्याकडे उदाहरण असताना, लोकांच्या मनात भीती राहील अशी गोष्ट करावीच का?
४. जनमानस: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोकांना काय हवे आहे? त्या प्रदेशाच्या लोकांना हे नको असेल, तर त्यांच्यावर लादणे, कितपत योग्य राहील? लोकं जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्यकर्त्यांना निवडून देतात. मात्र, म्हणून त्यांचा थेट विरोध करण्याचा अधिकार संपत नाही... जर लोकांचा थेट विरोध आहे, तर त्या भागात तो प्रकल्प राबवणे कितपत योग्य आहे? तो प्रकल्प झाल्यापासून, तेथील लोकं सतत भितीत वावरणार असतील, स्थलांतर करणार असतील तर, असा प्रकल्प राबविण्याचा हट्ट धरणे कितपत योग्य आहे, याचा विचार व्हावयास हवा..
५. आता पुढचा विचार येतो, की मग हा प्रकल्प नाकारला, तर कोकणला विकासच नकोय का? कोकणच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडथळा घालायचा आहे का? कोकणच्या लोकांना रोजगार नकोय का? याचे उत्तर फार सोप्पे आहे.
जे कोकणच्या पर्यावरणाला, मातीला, हवेला सुसंगत आहे, ते इथे आणलेत, तर कुणी विरोध करणार नाहीत. असा प्रकल्प म्हणजे अन्नप्रक्रिया उद्योगाचा. कोकणच्या लोकप्रतिनिधींनी ठरविले, आणि राज्यसरकार ने मनावर घेतलें, तर अख्ख्या देशांची भूक मिटवून, परदेशात एक्सपोर्ट करता येतील अशी भव्य खाद्य इंडस्ट्री कोकणात ऊभी राहु शकते. ज्यात करोडोंची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होतील. ही मोठी इंडस्ट्री हजारो लहान उद्योजकांना एकत्र घेउन पुढे जाईल. ह्यातून उद्योजकतेची भरभराट होईल. कोकणात अशी भव्य दिव्य अन्नप्रक्रिया उद्योगाची इंडस्ट्री आणि त्याची साखळी निर्माण होऊ शकते.अख्ख्या देशाची मत्स्य खाद्याची तहान भागवेल अशी मत्स्य उत्पादन आणि मत्स्य प्रक्रिया उद्योग निर्माण होऊ शकतो.
कोकणात मकेनिकल, आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स विषयात आयटीआय, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलेले तरूण आहेत. त्यांना रोजगार देऊ शकेल अशी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ची मोठी इंडस्ट्री कोकणात उभी राहु शकेल. त्यात, हेवी मशिनरी, मशिनरी इकविपमेंट, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन इंडस्ट्री, इलेक्ट्रिक व्हेईकल, लिथीयम बॅटरी असे कितीतरी पर्यावरणाला धोका. न पोहोचवणारे उद्योग इथे एकत्र येऊ शकतात.
तिसरी इंडस्ट्री जी कोकणात उभी राहू शकते ती आयटी, आयटी एनेबल्ड आणि हाय टेक्नोलोजी... जे पुण्यात झाले, तेच कोकणात होऊ शकते. अगदी बिपिओ , सॉफ्टवेअरपासुन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निगपर्यन्त सगळ्या सॉफ्ट आणि हार्ड वेअर इंडस्ट्री, आणि उत्पादन आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ करणाऱ्या इंडस्ट्री, कोकणात निर्माण होऊ शकतात.
ह्या तिन्ही उद्योगांमध्ये पर्यावरण ऱ्हास नसेल, गुंतवणूक आणि रोजगार वाढेल अशा इंडस्ट्री एकवटल्या जाऊ शकतात. यासाठी राज्य सरकार, सरकारच्या संस्था आणि कोकण विकास महामंडळ एकत्र काम करु शकेल.
कोकणात ५०,००० कोटींपर्यंत गुंतवणूक झाल्यास आणि कोकणातील उद्योजकांसाठी १०००० कोटींचा उद्यम निधी निर्माण झाल्यास, कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होईल, ज्यात:
१. कोकणची संसाधने उत्कृष्ट वापरली जातील.
२. कोकणच्या उद्योजकांना विकासाची द्वारे उघडतील
३. कोकणच्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल...
फक्त, थोडे व्हिजन हवे, बस्स!!
- हर्षद माने..