12/10/2023
कॉसमॉसचा कहर
सध्या पुणे-मुंबई व इतरही अनेक शहरांच्या अवतीभोवती कोणत्याही दिशेला गाडी प्रवास करताना आपणास फुलांचे ताटवे रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. खुपच सुंदर दिसतात ही फुले. या फुलांची वनस्पती साधारण चार ते दहा फुटांपर्यंत वाढु शकते. एका झाडास दोन तीन डझनापेक्षा जास्त फुले येतात. हा फुलोरा इतका दाट असतो की रस्त्याच्या दुतर्फा केसरी,पिवळी चादरच अंथरली आहे असे वाटते.
पण..
काय आपणास हे माहित आहे का की ही वनस्पती पश्चिम घाटातील पर्यायाने देशी देखील नाहीये. साधारण वीसेक वर्षांपुर्वी अशी फुले दिसत नव्हती. सह्याद्रीची म्हणुन जी काही फुले आहेत त्यामध्ये यांचा समावेश नव्हता. आपल्या पर्यावरणात मिसळुन जाईल अशी देखील ही फुले व फुलाझाडे नाहीत. या फुलांचा रंग सोडला तर आणखी काहीही कौतुक करण्यासारखे नाही. तण वाढावे तशी ही वनस्पती पसरत चालली आहे. आणि हिचा पसरण्याचा वेग व तग धरुन राहण्याची क्षमता कमालीची जास्त आहे. सुगंध नाही तसेच गाई-गुरांना चारा म्हणुनही यांचा वापर होऊ शकत नाही. याउलट गाई गुरे खातील असे गवत वा अन्य वनस्पतींना वाढण्यास जागाच राहत नाही या फुलझाडांमुळे. बरं, ही फुले तोडुन यांचा हार करावा, पुजा-प्रार्थनेमध्ये वापरावी म्हंटले तरी ही फुले तशी नाहीत. तोडली की लागलीच कोमेजुन जातात. मधमाश्या, फुलपाखरे अथवा भुंगे या फुलांकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. पर्यावरणास कोणत्याही पध्दतीने पुरक नसलेल्या या वनस्पतीला कॉसमॉस म्हणतात. याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबत होतो. विशेषतः गाडीवेगाने जाताना, गाडीमागे जो वा-याचा आवेग असतो त्यामुळे ही जास्त पसरली जाते. नशीब चांगले म्हणुन अद्याप सह्याद्रीच्या मावळ पट्ट्यात, कोकणात ही जास्त पसरली नाहीये. पण जर का एकदा हिचा प्रसार डोंगर द-यांमध्ये झाला तर तर स्थानिक, मुळच्या इथल्या असलेल्या वनस्पतीस तसेच जैवविविधतेस प्रचंड धोका भविष्यात संभवतो.
एकेकाळी कॉन्ग्रेस (गाजरगवत) नावाची एक वनस्पती आपल्याकडे खुपच फोफावली, इतकी की अन्य पिकांवर देखील तिचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. हि कॉन्ग्रेस देखील भारतीय नव्हती. कधीकाळी अमेरिकेतुन आलेल्या गव्हासोबत याचे बीज आले व या गाजरगवताने ने थयथयाट केला होता. कालांतराने धोका जानवु लागल्यावर याचा बिमोड करण्यात आपल्याला यश आले खरे.
पण कॉसमॉस च्या बाबतीत असा बिमोड करणे अजुनही अवघड होईल कारण याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबात कुठेही होत असतो. पडीक जमिनी, डोंगर उतार, द-या खो-या इत्यादी ठिकाणी जर यांचा प्रसार झाला तर कोण बिमोड करु शकेल याचा? खुप अवघड होणार आहे हे प्रकरण पर्यावरणासाठी. त्यामुळे आत्ताच सावध होऊन, ज्या ठिकाणी अजुन प्रसार फारसा झालेला नाही, त्या ठिकाणी त्यांना मुळासकट उपटुन टाकणे सोपे आहे. सह्याद्रीच्या गावागावात ही माहिती पोहोचवली पाहीजे. कृषिखाते, वनखाते यांनी याबाबतीत जनजागरण व लोकसहभाग द्वारे यावर काम सुरु करण्याची वेळ आत्ताच आलेली आहे. फुलोरा येण्यापुर्वीच जर हे उपटले तर बिमोड करणे शक्य होईल.
https://www.facebook.com/100001148870145/videos/3388671327847796/
हेमंत ववले,
निसर्गशाळा