04/05/2026
नरसापुरसारख्या घटनांवर समाजाची भूमिका — केवळ सरकार पुरेसे नाही
काल घडलेल्या नरसापुर प्रकरणामुळे जनक्षोभ उसळलेला दिसतो. अशा घटना घडल्या की समाजात संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि सरकारने यावर ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, हा प्रश्न फक्त आजचा नाही. यापूर्वीही मालेगाव, कलकत्ता यांसारख्या प्रकरणांमुळे विशेषतः तरुण मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढलेली आहे.
पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे — या घटनांसाठी केवळ सरकार आणि पोलीसच जबाबदार आहेत का?
वास्तविक पाहता, समाजाची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे. आज समाजात “मला काय त्याचं?” ही भूमिका वाढताना दिसते. अन्याय आपल्या कुटुंबाबाहेर घडत असेल, तर आपण दुर्लक्ष करतो. हीच उदासीनता अशा गुन्ह्यांना खतपाणी घालते.
पूर्वी समाजात एक प्रकारचा सामाजिक धाक होता. चुकीचे कृत्य केल्यास समाजाकडून निषेध, बहिष्कार किंवा दबाव येईल, ही जाणीव लोकांमध्ये होती. आज मात्र तो सामाजिक दबाव कमी झाल्यामुळे केवळ कायद्याच्या भीतीवर समाज चालत आहे. आणि हे स्पष्ट आहे की केवळ कायद्याच्या धाकाने असे प्रश्न पूर्णपणे सुटत नाहीत.
यासाठी समाजाने स्वतःकडे अंतर्मुख होण्याची गरज आहे:
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो का?
अन्याय दिसल्यास आपण आवाज उठवतो का?
गरज पडल्यास संबंधित यंत्रणांपर्यंत तक्रार पोहोचवतो का?
आजच्या घडीला तरुण मुली प्रचंड भीतीच्या वातावरणात जगत आहेत. अनेक सत्रांमध्ये हे जाणवते की त्यांना सतत भीती वाटते — “अशा घटना वाढल्या तर आमचे शिक्षण थांबेल का?”, “आम्हाला बाहेर पडता येईल का?”
जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुन्हा एकदा स्त्रियांना घरात बसवण्याची वेळ येऊ शकते — आणि हे समाजासाठी अत्यंत घातक ठरेल.
म्हणूनच, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
समाजातील मोठ्यांनी लहानांना संरक्षण देणे ही केवळ जबाबदारी नाही, तर त्यांचा हक्क आहे.
पूर्वी “एक मूल हे संपूर्ण कुटुंब, गल्ली आणि गावाचे असते” अशी भावना होती. आज मात्र मुलांकडे केवळ आई-वडिलांची ‘खासगी मालमत्ता’ म्हणून पाहिले जाते. इतर कुणी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली जाते. ही मानसिकता समाजासाठी धोकादायक आहे, कारण त्यामुळे सामाजिक नियंत्रण आणि परस्पर जबाबदारी कमी होत जाते.
निष्कर्ष
सरकार आणि कायदा आपले काम करतीलच, पण समाजानेही आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे.
अन्यायाविरोधात आवाज उठवणे
चुकीच्या गोष्टींना वेळेत रोखणे
समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे
ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
“मला काय त्याचं” ही भूमिका बदलून “हे आपल्या समाजाचं आहे” अशी भावना निर्माण झाली, तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.
आशा
Reflection