26/04/2026
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर पुण्यात ‘युवा संवाद’
लोकसभेतील विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेली मतदारसंघ पुनर्रचना, लोकसभा विस्तार आणि महिला आरक्षण ही तीन प्रमुख विधेयके देशाच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी आहेत. या पार्श्वभूमीवर, समाज विज्ञान अकादमी, पुणे येथे 'युवा संवाद' उपक्रमांतर्गत ‘मतदारसंघ पुनर्रचना: का? कशी? आणि त्याचे परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) करण्यात आले होते. याप्रसंगी अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचनेचा भारतीय संविधानातील इतिहास आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली. मतदारसंघ निश्चितीचे नेमके निकष काय असतात ? आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ते कसे असायला हवेत ? यावर त्यांनी प्रकाश टाकला. राज्यकर्त्यांची या विषयावर आजवरची भूमिका आणि सध्याची राजकीय परिस्थिती यातील फरकावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले.
महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना राजकीय पक्षांच्या आणि समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेवर प्रा. पवार यांनी टीका केली. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर विरुद्ध दक्षिण भारत, हिंदी भाषिक विरुद्ध बिगर-हिंदी भाषिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत विरुद्ध अप्रगत राज्ये अशी जी विषमतावादी फळी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
आगामी काळात 'युवा संवाद' अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र नियोजन टीम तयार करण्यात येईल, असा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. या चर्चासत्रात १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
#युवाप्रबोधन #मतदारसंघपुनर्रचना #लोकशाही #संविधान #युवासंवाद #राजकारण #महाराष्ट्र