CPIM Nanded

CPIM Nanded The Official Page Of The Communist Party Of India(Marxist) Dist. Nanded

18/03/2026

आज १८ मार्च २०२६ रोजी पीपल्स कॉलेज नांदेड येथे आरएसएस प्रणित राष्ट्र सेविका समिती (राष्ट्रीय महिला स्वयंसेवक समिती) आयोजित महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांनी उधळून लावून रद्द करण्यात आला आहे... यावेळी उपस्थित SFI च्या जिल्हा सचिव मीना आरसे,SFI जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कउडकर,अक्षय कुमार गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कुलदीप भाऊ राक्षसमारे सम्यक विद्यार्थी आंदोलन चे नेते आतिश ढगे, प्रबुद्ध काळे ,साई पाटील ,व असंख्य विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते...✊💙❤️

मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध!वृत्तपत्र...
17/03/2026

मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांच्यावरील आरोपांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध!

वृत्तपत्र निवेदन
17 मार्च 2026

महाराष्ट्रामध्ये मराठी खऱ्या अर्थाने राजभाषा, व्यवहारभाषा आणि त्याचप्रमाणे अर्थकारणाची भाषा व्हावी, मराठी विषय धोरणाची अंमलबजावणी व्हावी, हिंदी किंवा अन्य कोणत्याही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासून करण्यात येऊ नये, यासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे प्राध्यापक दीपक पवार हे लोकभाषेच्या चळवळीचे महत्त्वाचे नेते, प्रवक्ते आणि संघटक आहेत. मराठी भाषेचा मुद्दा हिंसक राजकीय अस्मितेमध्ये रूपांतरित न करता देखील त्याबाबत सरकारचा खोटेपणा, दांभिकपणा उघड करण्याचं अतिशय मोठं कार्य त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे आणि करत आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नाटके करून, मराठीला इतिहासाच्या देव्हाऱ्यात कायमचे बंद करण्याचे उद्दिष्ट संघ परिवाराचे आहे.

मराठी भाषिकांना म्हणजेच सर्वसामान्य मराठी कामगार, शेतकरी, श्रमिक व मध्यमवर्गीयांना आपल्या जनविरोधी अर्थनीतीची शिकार करण्याचे काम महाराष्ट्रातील राज्यकर्ते करत असताना, त्या विरोधात मराठी भाषकांचा रोजगाराचा, जगण्याचा आणि अस्मितेचा प्रश्न हे भिन्न नाहीत, असे ठासून मांडणारे आणि त्यासाठी संघटना तसेच जागृती तयार करण्याचं अतिशय मोठं काम प्राध्यापक दीपक पवार यांनी चालविलेले आहे.

त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यावर टीका केली म्हणून त्यांना अर्बन नक्षल ठरविणे हा भारतीय जनता पक्ष, त्यांचे फडणवीस सरकार यांच्या लोकशाही हक्क चिरडून काढण्याच्या कारस्थानाचा भाग आहे. संबंधित सर्व कायद्यांचे ते सर्रास उल्लंघन आहे. राज्यामध्ये जन सुरक्षा विधेयकासारखे कायदे सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी आणलेले आहेत, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य समिती याचा तीव्र निषेध करत आहे आणि स्पष्टपणे जाहीर करत आहे की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठामपणे प्रा. दीपक पवार यांच्या मागे उभा राहील. त्याचप्रमाणे मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये बेताल आणि बेबंद आरोप करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचा तो तीव्र आणि सक्रिय विरोध करेल.

डॉ. अजित नवले
राज्य सचिव
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

🌹*भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र*🌹आयोजित*🔴🔵 महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्...
16/03/2026

🌹*भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र*🌹

आयोजित

*🔴🔵 महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहनाच्या, शताब्दी वर्ष 🔵🔴*

*मानवी हक्क परिषद*

|| १९ मार्च २०२६, दुपारी २ वाजता ||
*कॉ. आर.बी. मोरे नगरी, बेटकर महाराज मठ, मु.लाडवली, महाड*
************************

|| २० मार्च २०२६.सकाळी ९ पासून ||
*चवदार तळे व क्रांतीभुमी येथे मिरवणूकीने चवदार तळे सत्याग्रहींच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन!*

*** *प्रमुख उपस्थिती* ***
- कॉ. एम.ए. बेबी (सरचिटणीस, माकप)
- डॉ.अशोक ढवळे (पॉलिट ब्युरो सदस्य, माकप)
- कॉ. मरियम ढवळे (पॉलिट ब्युरो सदस्य, माकप)
- मा. तुषार गांधी (महात्मा गांधींचे पणतू)
- कॉ. नरसय्या आडम मास्तर ( जेष्ठ कामगार नेते, माकप)
- डॉ. प्रज्ञा दया पवार (आंबेडकरी साहित्यिक)
- विद्रोही शाहीर, संभाजी भगत
- आमदार कॉ. विनोद निकोले (केंद्रीय समिती सदस्य, माकप)

*चलो महाड. मोठ्या संख्येने सहभागी व्हा!*
*समाज परिवर्तनाच्या चळवळीत, सक्रिय व्हा!*

आपला,भ्रातृभावी
डॉ. अजित नवले
राज्य सचिव, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
कॉ. शैलेन्द्र कांबळे (निमंत्रक,जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र)

साळवा येथिल बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा....माकप व जमस ची मागणी.   मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय...
11/02/2026

साळवा येथिल बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा....माकप व जमस ची मागणी.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात साळवा येथिल पीडित कुटुंबाची भेट घेऊन धीर देऊन आम्ही सर्व सोबत असल्याची ग्वाही दिली.
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे भूमिहीन कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करून आपले पोट भरते.
पीडित कुटुंब भूमिहीन असून 9 वर्षाची मतिमंद मुलगी 2 ऱ्या वर्गात शिकते, 28 तारखेला शाळेच्या दुपारच्या सुट्टीत ती खेळत असताना तिला 69 वर्षाचा आरोपी संतुकराम आवटे यांने चॉकलेट चे अमिष दाखवून पीडितेला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येऊन रडत असल्याने आईने काय झाले विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचे आई वडील यांनी आरोपीच्या घरी जाऊन विचारले असता त्याने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपये घे आणि घडलेला हा प्रकार कोणाला सांगू नका असे धमकावले आहे.त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि पुढील उपचार चालू असून मुलगी सुखरूप असल्याचे निदर्शनास आले.कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक होऊन त्यास परभणी येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे.


8 फेब्रुवारी 2026 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पीडित मुलीच्या घरी जाऊन आई-वडिलांना धीर दिला आणि आरोपीला कडक शासन झाले पाहिजे या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासण देण्यात आले तसेच पक्ष व महिला संघटना आपल्याला सोबत आहे असे सांगून पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.
पिडीत कुटुंबाच्या पुढील पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आणी लेकरांच्या शिक्षणासाठी शासकीय मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कुटुंब भूमिहीन बेघर असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे हेही निवेदन लवकरच देण्यात येणार असून पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची भूमिका माकप व जमस ने घेतली आहे. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गाभणे व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य नेत्या कॉ. रेहाना शेख, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.लता गायकवाड, कॉ. संगीता गाभणे कॉ.रमेश देवरे, कॉ. प्रकाश दांडेगावकर कॉ.रामा कंटाळे कॉ. रेणुका कंटाळे हे उपस्थित होते.

आज बिलोली तालुक्यातील मौजे कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर "महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (ल...
02/02/2026

आज बिलोली तालुक्यातील मौजे कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर "महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) च्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन पार पडले. धरणे आंदोलनात रोजगार हमी योजनेचे काम सुरू करणे, घरकुलाची बिले अदा करणे व पिण्याचे तसेच वापरण्याच्या पाण्याची सार्वजनिक पातळीवर व्यवस्था करावी या मागण्या करण्यात आल्या. सदर धरणे आंदोलनादरम्यान, मजूर विरोधी अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवून वरील मागाण्यांबरोबर, निषेधाचे सविस्तर विवेचन असलेले निवेदन मा. ग्रामविकास अधिकारी, कोल्हेबोरगाव यांच्यामार्फत मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांना पाठविण्यात आले.आंदोलकांसमोर चर्चेसह निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र शेतमजूर व इतर राज्यसहसचिव कॉम्रेड विनोद गोविंदवार, नांदेड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अंकुश अंबुलगेकर, जिल्हासचिव कॉम्रेड मंजुश्री कबाडे, जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड माधव देशाटवाड यांनी केलेआणि बिलोलीतील जनवादी चळवळीचे नेते कॉम्रेड गंगाधर आरसे यांचीही विशेष उपस्थिती होती.
मा. मुखेड तहसिलदार कार्यालय मार्फतही अर्थसंकल्पविषयी निवेदन सादर करण्यात आले.

अर्थसंकल्पाचा निषेध करणारे निवेदन खालीलप्रमाणे.

प्रति,
माननीय राष्ट्रपती, भारत सरकार, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली.
द्वारा, मा. ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हेबोरगाव,
ता. बिलोली, जि. नांदेड.

विषय:
श्रमिक वर्गाची कंबर मोडणारं आणि भांडवलदारांना मोठी सवलत देणारं भांडवलंदार धार्जिणं श्रमिक विरोधी अर्थसंकल्प २०२६ चा निषेध संबंधी निवेदन.
काल दिनांक 01/02/2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला नवीनतम केंद्रीय अर्थसंकल्प देशातील श्रमिक जनतेकडे दुर्लक्ष करणारा असून पुन्हा एकदा कॉर्पोरेट आणि मोठ्या भांडवलदारांच्या समर्थनात सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात निवडक उद्योगांना करसवलती, विविध सवलती तसेच दीर्घकालीन करसुट देऊन मोठ्या भांडवलाला प्राधान्य देण्यात आले आहे, तर सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाही. जनतेच्या वास्तविक समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी सरकारने महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांसाठीच्या तरतुदींमध्ये मोठी कपात करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. एकूण अर्थसंकल्पात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम विविध विभागांतील तरतुदींमध्ये दिसून येणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे दिसत नाही.
कृषी व शेतकरी कल्याण विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये गंभीर घट दिसून येते. या विभागाची तरतूद फक्त १,२७,२९०.१६ कोटी रुपयांवरून १,३०,५६१.३८ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी वाढती महागाई लक्षात घेता जवळजवळ नगण्य आहे. लहान व सीमांत शेतकरी तसेच मोठ्या प्रमाणावर असलेल्या शेतमजुरांना आधार देणाऱ्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या योजनांमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी विकास योजना यांसारख्या योजनांच्या तरतुदींमध्ये कपात करण्यात आली आहे. अनेक इतर योजना व विभागांसाठी, सुधारित अंदाज वाढलेले असतानाही, अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात इनपुट सबसिडीसाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये सातत्याने घट होत असल्याचा चिंताजनक कल स्पष्टपणे दिसतो. युरियासाठी दिली जाणारी तरतूद वर्षानुवर्षे २,०९४.५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे, तर पोषक तत्त्वांवर आधारित अनुदानात केवळ ५,००० कोटी रुपयांची अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. खत उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या एकूण सरकारी सहाय्यातही हाच कल दिसून येतो, जो २०२२-२३ पासून सातत्याने कमी होत आहे.

ग्रामीण विकास विभागासाठी या अर्थसंकल्पात १,९४,३६८.८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी यापूर्वी १,८७,७५४.५३ कोटी रुपये होती. ग्रामीण भारताच्या गरजांच्या तुलनेत ही वाढ अत्यंत अपुरी आहे. केंद्र सरकारच्या मासिक आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ग्रामीण विकास मंत्रालयाचा खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ५१ टक्के इतकाच झाला आहे, तर मागील वर्षी हा खर्च ६३ टक्के होता. हीच परिस्थिती सुधारित अंदाजांमध्ये देखील दिसून येते, जे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजांपेक्षा कमी असून सुमारे ७५८ कोटी रुपयांची तूट दर्शवतात.

ग्रामीण विकास विभागांतर्गत येणाऱ्या पेन्शन योजनांसाठीच्या तरतुदींमध्येही कपात करण्यात आली आहे किंवा कोणतीही लक्षणीय सुधारणा दिसून येत नाही. राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजना (National Family Benefit Scheme) साठीची तरतूद ६५९ कोटी रुपयांवरून कमी करून ४०० कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना (IGWPS) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठीच्या तरतुदी मागील वर्षाच्या पातळीवरच ठेवण्यात आल्या आहेत.
विकसित भारत ग्रामीण रोजगार व उपजीविका अभियान (ग्रामीण) [VB-ग्राम (G)] साठीची तरतूद फक्त ९५,६९२.३१ कोटी रुपये इतकी आहे. भाजप सरकारने या योजनेचे जोरदार समर्थन करत सर्व टीका फेटाळून लावली होती आणि कामाचे दिवस १०० वरून १२५ पर्यंत वाढवले जातील, असा दावा केला होता. मनरेगा समाप्त करण्यामागील आपला खरा उद्देश – ग्रामीण भारतातील रोजगाराची हमी संपवणे – लपवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. मात्र या नव्या कायद्यासाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी स्पष्ट करतात की सरकार ग्रामीण भारतातील जनतेला रोजगाराची हमी देण्याबाबत गंभीर नाही. ग्रामीण भागातील सर्व काम मागणाऱ्यांना रोजगार देण्यासाठी किमान २.५० लाख कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे. संसदेच्या समितीने मनरेगाअंतर्गत केंद्र सरकारच्या तरतुदी आणि किमान मजुरी दोन्ही वाढवण्याची शिफारस केली होती; मात्र या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने संसदेच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे आधीच भूक आणि प्रचंड बेरोजगारीचा सामना करणाऱ्या ग्रामीण जनतेची परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पातून हे स्पष्ट होते की भाजप-नेतृत्वाखालील सरकार ग्रामीण भारतातील जनतेसाठी पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत हक्कांबाबत आपल्या प्राधान्यक्रमात सातत्याने कपात करत आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान अथवा जल जीवन मिशनमध्ये २०२४-२५ दरम्यान झालेल्या प्रत्यक्ष खर्चात मोठी घट झाली आहे, जी २०२६ च्या अर्थसंकल्पातून उघड झाली आहे. हीच दिशा मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातही दिसून आली होती. याउलट, २०२३-२६ या कालावधीतील प्रत्येक वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अंदाज जवळजवळ सारखेच ठेवण्यात आले आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष खर्चातील घटेशी थेट संबंध दिसत नाही. सुधारित खर्चाचे आकडे सातत्याने घट होत असल्याकडे निर्देश करतात आणि २०२५-२६ साठीचा सुधारित अंदाज १७,००० कोटी रुपये इतका आहे, जो या घसरणीच्या प्रवृत्तीला कायम ठेवतो.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्यायाशी संबंधित योजनांनाही या अर्थसंकल्पात अत्यंत मर्यादित वाटा देण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी भागांतील वाढती वंचना, जमिनीपासून बेदखली आणि जातीय अत्याचारांची तीव्रता कायम असतानाही, अर्थसंकल्प २०२६ मध्ये या प्रश्नांसाठीची तरतूद सातत्याने अत्यल्प ठेवण्यात आली आहे. केंद्रीय क्षेत्रातील योजनांवरील एकूण खर्चापैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठीच्या बहुतेक योजनांना केवळ ०.०००५ टक्के हिस्सा मिळतो. एकत्रितपणे पाहता, अनुसूचित जातींसाठीची पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती, पीएम अजय योजना (एससीसाठी), एससी, एसटी आणि ओबीसींसाठी पीएम यंग अचिव्हर पुरस्कार, आदिवासी विकास कार्यक्रम, मिशन वात्सल्य (बालकल्याणासाठी) आणि मिशन शक्ती (महिलांसाठी) — या सर्व मिळून केंद्रीय क्षेत्रातील एकूण खर्चाच्या केवळ ०.०१ टक्के इतक्याच ठरतात.
नवीन शिक्षण धोरण २०२० आणि उच्च शिक्षणातील सुधारणांबाबत मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला असला, तरी या अर्थसंकल्पातील शिक्षणासाठीची तरतूद अत्यंत निराशाजनक आहे. २०२६-२७ साठी शिक्षण क्षेत्रासाठी प्रस्तावित १,३९,२८९ कोटी रुपयांची तरतूद ही सरकारने स्वतः अंदाजित केलेल्या ३९३ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीच्या तुलनेत केवळ ०.३५ टक्के इतकी आहे, जी अत्यंत अपुरी आहे. शालेय शिक्षणाशी संबंधित इतर केंद्रीय प्रायोजित योजनांची स्थितीही तितकीच चिंताजनक असून, समग्र शिक्षा आणि पीएम श्री यांसारख्या योजनांच्या तरतुदींमध्ये अत्यल्प किंवा जवळजवळ शून्य वाढ याचे स्पष्ट संकेत देतात.
सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतही चित्र फारसे वेगळे नाही. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेसाठीची तरतूद २,२०० कोटी रुपयांवरून कमी करून २,००५ कोटी रुपये करण्यात आली आहे, म्हणजेच सुमारे १५० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. आरोग्य आणि आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित इतर महत्त्वाच्या योजनांसाठीही अर्थसंकल्पात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांमध्ये एकूण केवळ ६०३.९३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच केंद्रीय क्षेत्रातील योजनांचे सुधारित अंदाज हे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजांपेक्षा कमी आहेत, जे देशातील ढासळत्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर निधीचा अपुरा वापर होत असल्याकडे निर्देश करतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू इच्छितो”; मात्र या अर्थसंकल्पात देशाला त्या दिशेने नेणारे काहीही दिसून येत नाही. भारताच्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये असे नमूद करण्यात आले होते की जागतिक बाजारपेठ पुढील काळातही अस्थिर राहण्याची शक्यता आहे आणि २००८ पेक्षाही गंभीर जागतिक आर्थिक संकट येण्याची १० ते २० टक्के शक्यता आहे. केंद्र सरकारच्या स्वतःच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेल्या या चिंतेचा कोणताही परिणाम अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये दिसून येत नाही. वाढती उत्पन्न विषमता, महागाई, बेरोजगारी, कृषी संकट, पर्यावरणीय ऱ्हास, निरक्षरता आणि दारिद्र्य या समस्यांशी सामना करण्यात हा अर्थसंकल्प पूर्णतः अपयशी ठरत असल्याचे दिसते. यामुळे केवळ जनतेचे जीवन अधिक दयनीय होत नाही, तर जीवित व मालमत्तेच्या हानीची शक्यता देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत हा अर्थसंकल्प आणि सत्ताधारी सरकारची संकल्पना ही दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनांपलीकडे काहीही नाही. म्हणून आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करून अशी मागणी करतो आहोत की, विशेष संसदीय अधिवेशन बोलावून नव्याने फेरमांडणी करून, श्रमिकांच्या बाजूने अर्थसंकल्प वळवावा ही नम्र विनंती.

निवेदक

कॉ. विनोद गोविंदवार
कॉ. अंकुश अंबुलगेकर
कॉ. मंजुश्री कबाडे
कॉ. माधव देशटवाड

01/02/2026

दलित कुटुंबीय अत्याचार प्रकरणी कठोर कार्यवाही करा अन्यथा जाती अंत संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार.
जाती अंत संघर्ष समिती च्या वतीने शेलोडी ता कळमनुरी जी हिंगोली येथे शिस्टमंडळाने भेट देऊन अन्यायग्रस्त खंदारे कुटुंबियांना धीर दिला.
28 जानेवारीस गावातील दस्तुरखुद्द तंटा मुक्ती अध्यक्ष रामराव मस्के यांनी पुरुष महिला असे तीस ते चाळीस जणांचा जमाव जमऊन शेलोडी तील बौद्ध समाजाचे खंदारे कुटुंबीय यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला.
गावातील निवृत्त पोलीस अधिकारी श्री सीताराम खंदारे यांनी सांगितले की गाव तसे खूप चांगले, बौद्ध व हाटकर समाज हे गुण्यागोविंदाने राहणारे , आत्तापर्यंतच्या इतिहासात जातीय अत्याचाराच्या दृष्टीने झालेली ही पहिलीच घटना,काहींनी सांगितले की अलीकडे आर एस एस ची पाटी लागली, बजरंग दलाची शाखा या मुळे नवीन पिढी बिघडली.
इंदूताई नेतने सांगू लागल्या की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा घेता तर कपाळाला कुंकू का लावता ? गळ्यात मंगळसूत्र का घालता अशा प्रकारे डिवचण्याचे प्रकार वाढले आहेत, एक तरुण सांगू लागला की भीमा कोरेगाव चे गाणे लावले की विरोध होऊ लागला आहे.
27 जानेवारी रोजी अश्याच बाबी वरून तक्रारदार दलित तरुणी चे भाऊ पवन व विश्वरत्न यांचे गावातील बालाजी मस्के याचे सोबत झालेल्या भांडणाचा राग धरून तंटामुक्ती चे अध्यक्ष रामराव संभाराव मस्के हे त्यांच्या महीला व पुरुषांसह हातात काठया लाठ्या घेऊन दगडांसह हल्ला चढवला यात अनेक जण जखमी झाले,कुणी फ्रॅक्चर झाले , कुणाचे डोके फुटले.
वडिलांना व भावांना वाचवण्यासाठी तक्रारदार तरुणी गेली असता तिच्या सोबत अभद्र अभद्र माणुसकीला काळिमा फासणारा असा व्यवहार केल्या गेला.
या प्रकरणी गुन्हेगारांना विरुद्ध कठोर कार्यवाही व्हावी या साठी जाती अंत संघर्ष समिती तीव्र आंदोलन करेल असा निर्णय घेण्यात आला असून सर्व शक्तीनिशी खंदारे कुटुंबियांच्या सोबत आम्ही आहोत असा विश्वास पीडितांना देण्यात आला.
या शिस्टमंडळात कॉ विजय गाभने, कॉ अंकुश बुधवंत, कॉ चपंत नाईक, कॉ सुरेश काचगुंडे, कॉ दिनाजी क्षीरसागर आदी कार्यकर्ते सामील होते.

दलित कुटुंबीय अत्याचार प्रकरणी कठोर कार्यवाही करा अन्यथा जाती अंत संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार.     जाती अंत संघर्ष स...
01/02/2026

दलित कुटुंबीय अत्याचार प्रकरणी कठोर कार्यवाही करा अन्यथा जाती अंत संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार.
जाती अंत संघर्ष समिती च्या वतीने शेलोडी ता कळमनुरी जी हिंगोली येथे शिस्टमंडळाने भेट देऊन अन्यायग्रस्त खंदारे कुटुंबियांना धीर दिला.
28 जानेवारीस गावातील दस्तुरखुद्द तंटा मुक्ती अध्यक्ष रामराव मस्के यांनी पुरुष महिला असे तीस ते चाळीस जणांचा जमाव जमऊन शेलोडी तील बौद्ध समाजाचे खंदारे कुटुंबीय यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला.
गावातील निवृत्त पोलीस अधिकारी श्री सीताराम खंदारे यांनी सांगितले की गाव तसे खूप चांगले, बौद्ध व हाटकर समाज हे गुण्यागोविंदाने राहणारे , आत्तापर्यंतच्या इतिहासात जातीय अत्याचाराच्या दृष्टीने झालेली ही पहिलीच घटना,काहींनी सांगितले की अलीकडे आर एस एस ची पाटी लागली, बजरंग दलाची शाखा या मुळे नवीन पिढी बिघडली.
इंदूताई नेतने सांगू लागल्या की बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा घेता तर कपाळाला कुंकू का लावता ? गळ्यात मंगळसूत्र का घालता अशा प्रकारे डिवचण्याचे प्रकार वाढले आहेत, एक तरुण सांगू लागला की भीमा कोरेगाव चे गाणे लावले की विरोध होऊ लागला आहे.
27 जानेवारी रोजी अश्याच बाबी वरून तक्रारदार दलित तरुणी चे भाऊ पवन व विश्वरत्न यांचे गावातील बालाजी मस्के याचे सोबत झालेल्या भांडणाचा राग धरून तंटामुक्ती चे अध्यक्ष रामराव संभाराव मस्के हे त्यांच्या महीला व पुरुषांसह हातात काठया लाठ्या घेऊन दगडांसह हल्ला चढवला यात अनेक जण जखमी झाले,कुणी फ्रॅक्चर झाले , कुणाचे डोके फुटले.
वडिलांना व भावांना वाचवण्यासाठी तक्रारदार तरुणी गेली असता तिच्या सोबत अभद्र अभद्र माणुसकीला काळिमा फासणारा असा व्यवहार केल्या गेला.
या प्रकरणी गुन्हेगारांना विरुद्ध कठोर कार्यवाही व्हावी या साठी जाती अंत संघर्ष समिती तीव्र आंदोलन करेल असा निर्णय घेण्यात आला असून सर्व शक्तीनिशी खंदारे कुटुंबियांच्या सोबत आम्ही आहोत असा विश्वास पीडितांना देण्यात आला.
या शिस्टमंडळात कॉ विजय गाभने, कॉ अंकुश बुधवंत, कॉ चपंत नाईक, कॉ सुरेश काचगुंडे, कॉ दिनाजी क्षीरसागर आदी कार्यकर्ते सामील होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ विजय गाभने यांना 20 वे विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रण ...
20/01/2026

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ विजय गाभने यांना 20 वे विद्रोही साहित्य संमेलनाचे निमंत्रण देतांना संयोजक कॉ किशोर ढमाले, सोबत कॉ आदींनाथ इंगोले, कॉ हेमंत कार्ले, कॉ अरुण दगडू,कॉ प्रदिप महाजन

11/01/2026

नांदेड प्राभाग क्रमांक १० चे मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे अधिक्रुत उमेद्वार कॅा. गंगाधर गायकवाड यांना निवडुन आलावर काय करायचंय? विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं पहा .
#नांदेडकर

पडलो तरी चालेल पण लाचार होऊन मत मागणार नाही आणि धमक्यांना भीक घालणार नाही...!मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड नांदेड वाघाळा शहर...
03/01/2026

पडलो तरी चालेल पण लाचार होऊन मत मागणार नाही आणि धमक्यांना भीक घालणार नाही...!

मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० (अ) अनुसूचित जाती प्रवर्गातील डावी लोकशाही आघाडीचा पुरस्कृत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे.
मी इयत्ता ८ मध्ये असताना (१९९० ला) एसएफआय मध्ये असताना माकपचा पक्ष सभासद झालो.

★मी आजपर्यंत म्हणजेच मागील ३६ वर्षात कधीही पक्ष बदललेला नाही.
आजपर्यंत पक्षाच्या आदेशानुसार फॅसिस्ट पक्ष निवडून येऊ नये म्हणून मतदान केले.
कधीही तडजोड केली नाही. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून नेहमीच सर्व मित्र पक्षाचा आदर केला.
नेहमी प्रमाणे काँग्रेस आणि इतर घटक पक्षानी धोका दिल्यामुळे आणि पक्ष आदेशानुसार मी ही निवडणूक केवळ २० हजार रुपयात लढावीत आहे. फंडातून जमा झालेली रक्कम आम्ही खर्च करीत आहोत.
सद्यास्थितीत गलिच्छ झालेल्या राजकारणाचा फटका मलाही बसला आहे.
धमक्या, दबाव, आमिष ह्या सर्व बाबी अनुभवास येत आहेत.
मी जगातल्या कोणत्याही शक्तीला घाबरत नाही. त्यामुळे कुणीही धमकावण्याचा प्रयत्न करू नये.

★हॊ... मी तोच गंगाधर गायकवाड ज्याने अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवडणूक खर्चाचा तपशील रेमन मेगसेसे पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पत्रकार पी. साईनाथ यांना चोवीस तासात उपलब्ध करून दिला होता आणि पेड न्यूज प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते.
नांदेड बॉम्ब ब्लास्टची सीबीआय इन्कवारी लावणारा तो मीच आहे.
रजिस्ट्री घोटाळा,जमीन घोटाळा,मुद्रांक घोटाळा, बोगस बांधकाम कामगार घोटाळा असे कितीतरी घोटाळे मी उघडकीस आणले आहेत.

★अविरत जनतेत असल्यामुळे तेव्हा मंजूर झालेले शस्त्रधारी पोलीस संरक्षण नाकारणाराही मीच आहे.
दगाबाज असलेल्या मित्रांनी धोका दिला आणि या निवडणुकीला सामोरे जात आहे.

★दीडसे एकर जमीन असलेल्या आजोबाचा मी लाडका नातू आहे.एशोअराम नाकारून दोन दोन वर्षे अखंड आंदोलन चालवीणारा मी कार्यकर्ता आहे. एकेकाळी चोवीस तास सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता नेते झाल्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.
संसदिय लोकशाही मान्य असल्यामुळे मी या निवडणुकीत संविधानिक मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे.

★माझ्या संकल्पनेतून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना अनुदान, ख्रिश्चन दफनभूमी, ट्रान्सजेंडर यांचे प्रश्न तसेच अनेक पीडित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले अथक प्रयत्न हाच माझा वयक्तिक जाहीरनामा आहे.
मला चळवळीतील पॅन्थर पुरस्काराने सन्मानित केले असल्यामुळे मी कॉम्रेड प्लस पॅन्थर आहे आणि कॉम्रेड व पॅन्थर कधीच लाचार होऊन भीक मागणारे नसतात हा इतिहास आहे.

म्हणून मी लाचार होऊन मत मागणार नाही.

★माझ्या पेक्षा दुसरा कुणी सरस उमेदवार वाटत असेल तर त्याला आपले मत द्यावे अन्यथा रस्त्यावरची लढाई मी सातत्याने लढणार असल्यामुळे एक संधी मला द्यावी आणि नगरसेवक याचे काम काय असते हे प्रत्यक्षात पाहून घ्यावे.

-कॉ.गंगाधर गायकवाड,
मो. ७७०९२१७१८८.
उमेदवार - प्रभाग क्रमांक १० अ दत्तनगर, अनुसूचित जाती प्रवर्ग
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, नांदेड.
जयभीम - लाल सलाम!
इन्कलाब जिंदाबाद...!!

Address

Sangharsh Bhavan Near MGM College Nanded
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPIM Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share