19/01/2022
*शिवसेनेचा मराठी फलकांचा खेळखंडोबा*
या लेख प्रपंच मागील प्रयोजन एवढ्यासाठीच, शिवसेनेचे नेत्रचक्षु आकस्मित जागृत झाले, दिव्यदृष्टी झाली आणि स्वर्गप्राप्तीचा मार्ग प्रशस्त झाला. थोडक्यात काय तर शिवसेनेसाठी मुंबई मनपा हे स्वर्ग आणि पुन्हा सत्ता प्राप्तीसाठी मराठी नामफलकचा पुळका जागृत झाला. याद्वारे पुन्हा सत्ता प्राप्त होईल हे दिवास्वप्न शिवसेना पाहू लागली. मराठी भाषा, लिपी-बोली हा विषय शिवसेनेच्या ध्येय धोरणात सुरवातीपासूनच होता. पण त्यासाठी खासे प्रयत्न कधीही झाले नाहीत. १९९५ - २००० सत्ता असतानाही विधानसभेत याविषयावरील चर्चेत शिवसेनेने हे अशक्य म्हणत अंग झटकले होते. १९९६ ते २००६ या कालावधीत शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा मी, अरुण बेतकेकर सरचिटणीस होतो. सन २००२ साली दुकाने व आस्थापनावरील नामफलकात प्रामुख्याने मराठी भाषेस प्राधान्य असावे यासाठी मी आंदोलन उभे करायचे निश्चित केले. संमती व मार्गदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो. आंदोलनाचे स्वरूप कसे असेल व त्याचे परिणाम काय होतील याची सविस्तर कल्पना मांडली. बाळासाहेब भारावून गेले, भरभरून बोलले, आपल्या कौशल्याची भर टाकली व आंदोलनास उत्स्फूर्तपणे अनुमती दिली. याच विषयावर महासंघाचे अध्यक्ष गजानन किर्तीकर यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांना भेटत हिच कल्पना मांडली. प्रतिसाद थंडा, ना हो, ना नको.
शनिवार २९ जून २००२ आंदोलनाचा दिवस ठरला. नारिमन पॉईंट, हुतात्मा चौक ते ज्योतिबा फुले मार्केट हा परिसर निश्चित केला. परिसराची २० भागात विभागणी केली, त्याचे नकाशे तयार केले. प्रत्येक विभागात ४० ते ५० कार्यकर्ते. असे एकूण १००० कार्यकर्ते सहभागी होते. लक्ष होते १०,००० इंग्रजी नामफलकावर एकाच रात्री डांबर फासण्याचे. यासाठी लागणारे साहित्य उदा. शिड्या, डांबर, काळा रंग, काळ्या रंगाचे स्प्रे कॅन पुरविण्यात आले. रात्री ११:०० नंतर ज्यावेळी हा परिसर निर्मनुष्य होतो, आंदोलन सुरु करण्याचे ठरले. दरम्यान बाळासाहेब वेळोवेळी संपर्क करून माहिती घेत होते, प्रोत्साहन देत होते, पण उद्धवजींचे काय चालले होते ? आंदोलनाची जय्यत तयारी झाली होती आणि दुपारी ४:०० च्या दरम्यान उद्धवजींचे आपमतलबी हेर व संदेशवाहक अनिल देसाई अनपेक्षितपणे महासंघ कार्यालयात दाखल झाले. माझ्या कानी लागले म्हणाले, "अरुण हे आंदोलन करू नकोस, थांबावं." मी बधत नाही म्हटल्यावर पुड्या उघडायला सुरवात केली. "उद्धवजींना हे आवडणार नाही, त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल." मी म्हणालो, "आंदोलनासाठी थोड्याच वेळात कार्यकर्ते जमतील, तुझ्याच तोंडून हे तूच त्यांना सांग." ते अपयशी परतले. त्यानंतर रात्री ८:३० दरम्यान अध्यक्ष कीर्तिकर लगबगीने कार्यालयात आले. तयारीस लागलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून त्यांना संबोधित करत म्हणाले, "या आंदोलनास माझा पाठिंबा नसेल. घाईने हाती घेतलेले हे आंदोलन आहे. पुढे येणाऱ्या परिणामास माझे काही सहकार्य नसेल." वैगरे- वैगरे. भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांनी जुमानले नाही, कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ते तावातावाने निघून गेले. फूट पाडण्याचा, आंदोलन स्थगित करण्याचा शेवटचा प्रयत्नही असफल झाला. आंदोलन फत्ते झाले. निश्चित केलेल्या परिसरातील अंदाजे १०,००० नामफलक, दर्शनीय व प्रदर्शनीय भाग काळे फासून विद्रुप केले गेले. रात्री २:०० च्या दरम्याने पोलीस दाखल झाले, कार्यकर्त्यांना अटक झाली, केसेस झाल्या. आंदोलन कव्हर करण्यासाठी प्रतिष्ठित वर्तमानपत्र व टीव्ही चॅनेल्स यांना अंतिम समयी बोलावून घेतले होते. त्यामुळे सर्वत्र बातम्या प्रामुख्याने झळकल्या, चर्चासत्र सुरु झाले. पोलीस कोठे होते हा विषय चर्चेत आला. या सर्वांचा परिणाम असा झाला कि, संपूर्ण महाराष्ट्रभर उत्स्फूर्तपणे या आंदोलनाचे लोन पसरत गेले. सर्वत्र एकच चर्चा, शिवसेनेचे मराठी नामफलक. मराठी माणूस सुखावला. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी माझे अभिनंदन केले. बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावून पाठ थोपटली. त्यांना आंदोलनाची पुढील दिशा सांगितली, १० दिवसांची मुदत, त्यानंतर दुकानाच्या काचा फुटतील हा संदेश संबंधितांना दिला जाईल.
आंदोलनाच्या व्याप्तीतून एकाच्या पायाखालची जमीन मात्र सरकू लागली, का ते ठाऊक नाही. अचानक हे धगधगत चाललेले आंदोलन शमत गेले. नंतर कळले मातोश्रीवरूनच मुंबईचे विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, विश्वासातील पदाधिकाऱ्यांना आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश गेले आणि निश्चितपणे याविषयास २० वर्षापूर्वीच न्याय मिळण्याची सुवर्णसंधी शिवसेनेने हातची गमावली. दुर्दैव असे, विरोधाभास पहा, मातोश्रीच्या एकाच छताखालील २ मजल्यावरून वेगवेगळे आदेश सुटत होते. त्यानंतर आठवड्याभरात उद्धवजींनी मला व कीर्तिकर यांना मातोश्रीवर बोलावले, आमच्या आधीच मुंबईतील त्यावेळचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते ज्यांचे दैनंदिन एकमेव काम, मातोश्रीवर हजेरी लावणे, उद्धवजींची हुजरेगिरी, खुशमस्करी, भाटगिरी व विदुषकी चाळे करत त्यांना खुश ठेवणे. आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. उद्धवजी अवतरले. स्थानापन्न होताच त्यातील एका विभागप्रमुखाने चेष्ठेच्या सुरात पूर्वनियोजित प्रश्न केला, "हे मराठी नामफलकाचे आपण केलेले आंदोलन लोकाधिकार महासंघाचे कसे ? तो आमचा अधिकार आहे." लागलीच उद्धवजी यांनी आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटे ओठावर ठेवत कुच्छीतपणे हसून त्यास प्रोत्सहन देते झाले. मी म्हणालो, "खरे आहे ! हे आंदोलन तुमचेच पण ते तुम्ही केले असते तर आमची गरज पडली नसती. तुम्ही ते करणार नाही, कारण व्यापाऱ्यांशी आपण हफ्ते बांधून घेतलेले असतात. तसेच हॉटेल, बारवर फुकट खाल्ल्या - पिल्यावर आपल्याकडून आंदोलन शक्य होईल का ? अनपेक्षित, हे ऐकताच तो अवाक झाला. त्याहीपेक्षा उद्धवजींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
२० वर्षांपूर्वीचा हा विषय, तेव्हा चिरडला मग आता त्याची उपरती का झाली ? यास एकमेव कारण, आगामी मुंबई मनपा निवडणूक. नित्याप्रमाणे मराठी जनाशी भावनेचा खेळ. ते भारावून जातील, डोळ्यात अश्रू आणून शिवसेनेस भरभरून मतदान करतील. हे दिवास्वप्न बघण्याचे बंद करा. ते भावनिक राजकारण करण्याचे दिवस संपले. आपल्या कारकिर्दीतील, प्रामुख्याने मा. मु. झाल्यानंतर केलेले कारनामे, मराठी व हिंदुत्व या दोहोंनाही दिलेली मूठमाती, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत असंगतांशी केलेली संगत अश्या अनेक बाबी ज्या मराठी जन कधीच विसरणार नाही.
- *अरुण बेतकेकर*
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)