31/08/2019
*ब्राम्हणद्वेषाने पछाडलेल्या आमदार नितेश राणेंना भारतीय जनता पक्ष आपल्या मूलभूत विचारसरणीला तिलांजली देऊन पक्षप्रवेश देणार आहे का...?*
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी दिनांक १ सप्टेंबर रोजी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची घोषणा केली. खरं तर नारायणराव राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व....! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नारायण राणेंसारख्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची घोषणा ही भाजपच्या राज्यातील वरच्या फळीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन करणे अपेक्षित होते. दरम्यानच्या काळात नारायण राणेंच्या एकंदरीतच राजकीय कारकिर्दीची जी वाताहात लागली, त्यामुळे त्यांना भाजप पक्षात प्रवेश देण्यास कुणालाही काडीचेही स्वारस्य उरले नव्हते. राजकारणात संयमाचे महत्व अनन्यसाधारण आहे परंतु हाच संयम राणेंपाशी कधीच नव्हता. किंबहुना त्यांच्याकडे संयम नसल्यामुळेच ते राजकारणातून नाहीसे झाले. त्यानंतरही आपल्या स्वभावात त्यांनी थोडासुद्धा बदल केलेला नाही. तीन दिवसापूर्वी अगदी उतावीळपणे त्यांनी स्वतःच दिनांक १ सप्टेंबर रोजी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची घोषणा करून टाकली. भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने राणेंच्या पक्षप्रवेशाच्या बातमीला दुजोरा दिला नाही. तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. 'मान ना मान मैं तेरा मेहमान' यातलाच हा केविलवाणा प्रकार होता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नारायण राणेंसारख्या नेत्याला हे उतावीळ वर्तन कधीही शोभणारे नव्हते. नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नारायण राणेंना भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेत खासदारकी दिलेली आहे. त्यामुळे ते एका अर्थाने भारतीय जनता पक्षाचे सदस्यच आहेत परंतु त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण करायचे की नाही याचा निर्णय मित्रपक्ष शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय घेणे उचित ठरणार नाही." राजकारणात ज्यांना दोन ओळींच्या मधला न लिहिलेला भाग वाचता येतो त्यांना मुख्यमंत्री महोदयांना नेमके काय म्हणायचे आहे ते एव्हाना नक्कीच समजले असेल. मुख्यमंत्र्याना एवढेच सुचवायचे होते की नारायण राणेंना भाजप पक्षात प्रवेश देण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही परंतु महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण करण्यास म्हणजेच नारायण राणेंचे दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांना भाजप पक्षात प्रवेश देण्यास मुख्यमंत्री महोदय अनुकूल नाहीत. थोडक्यात सांगायचे तर मुख्यमंत्री एकावर दोन फ्री घ्यायला तयार नाहीत...!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला आमदार नितेश राणेंची राजकीय पार्श्वभूमी तितकीच कारणीभूत आहे. २०१४ साली नितेश राणे आमदार बनले आणि त्यांना लहान वयातच मराठा समाजाचे राज्यव्यापी नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी गेली कित्येक वर्षे अतिशय समर्थपणे मराठा समाजाचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांनी अनेक खचता खाल्ल्या, तळागाळात जाऊन मराठा समाजातील बांधवांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सत्तेचा व पदाचा वापर करून मार्गी लावल्या. तेव्हा कुठे मराठा समाजाने त्यांना आपला नेता म्हणून सर्वमान्यता दिली. आमदार नितेश राणेंना प्रत्यक्ष फिल्डवर उतरून मराठा समाजासाठी करावी लागणारी ही मेहनत पेलवणार नव्हती आणि त्यांची तेवढी वैचारिक कुवत देखील नव्हती पण त्याच वेळी मराठा समाजाचे राज्यव्यापी नेतृत्व करण्याची त्यांची महत्वाकांक्षा मात्र अफाट असल्याने आपल्या महत्वाकांक्षेला मूर्त स्वरूप देण्यासाठी नितेश राणेंनी तुलनेने अतिशय सोपा मार्ग निवडला. ब्राह्मण समाज हाच मराठा समाजाचा खरा शत्रू आहे आणि या ब्राह्मणांमुळे गेली वर्षानुवर्षे मराठा समाजातील तरुणांना अन्याय सहन करावा लागतोय, असे आभासी चित्र त्यांनी मराठा समाजातील तरुणांसमोर निर्माण केले. हे चित्र निर्माण करत असतानाच ब्राह्मण समाजाविरोधात लढण्यासाठी आपणच मराठा समाजाचे नेतृत्व करू शकतो, हा विश्वास समाजबांधवांमध्ये निर्माण करायचा आणि त्यातूनच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा त्यांचा डाव होता. त्यासाठी नितेश राणेंना तळागाळात जाऊन प्रत्यक्षात फिल्डवर उतरून मेहनत घ्यावी लागणार नव्हती. थोडक्यात ब्राह्मण समाजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करून मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करायचे, इतका साधासोपा हा फॉर्म्युला होता. याच फॉर्म्युल्याच्या आधारावर काम करताना त्यांनी जातीवाचक द्वेष पसरवणारी वक्तव्ये करण्याचा सपाटाच लावला. आमदार नितेश राणेंनी ब्राह्मणविरोधी वक्तव्ये करून पुरोगामी महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रभर ब्राह्मणद्वेष अधिक जोराने भडकावा म्हणून त्यांनी ब्राम्हण समाजात आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संभाजी भिडे अशा आदरणीय व्यक्तिमत्वांना टार्गेट केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोप-यात पोहोचला. बाबसाहेबांनी आपले सगळे आयुष्य शिवचरित्र लिहिण्यासाठी समर्पित केले. त्यासाठी ते सगळे गड, किल्ले, द-याखो-यात अगदी उन्हातान्हाची पर्वा न करता वर्षानुवर्षे फिरले. त्यामुळेच आमच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजू शकला. अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची आमदार नितेश राणेंनी 'बाब्या पुरंदरे' असा एकेरी उल्लेख करून खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्रभूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला पण जातीद्वेषाची कावीळ झालेल्या नितेश राणेंनी या सत्काराचे निमित्त काढून जातीद्वेषाचे विखारी राजकारण सुरु केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि त्यांचा राज्यात इतरत्र कुठेही सत्कार करू देणार नाही, अशा जाहीर धमक्या देऊन आगपाखड करण्यात आमदार नितेश राणे अग्रेसर होते. बाबासाहेब पुरंदरेंप्रमाणेच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींबद्दल आमदार नितेश राणेंनी अपमानास्पद वक्तव्ये केली. संभाजी भिडे गुरुजींना तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुरुस्थानी मानतात. मात्र त्याच संभाजी भिडेंच्या वयाचाही मान न राखता त्यांना 'भिड्या' म्हणून एकेरी शब्दात हिणवणारे नितेश राणेच होते. सर्वत्र ब्राम्हण समाजाबद्दल द्वेष पसरवण्यासाठी आमदार नितेश राणे जाणीवपूर्वक बाबासाहेब पुरंदरे व संभाजी भिडे या दोघांवरही पातळी सोडून टीका करीत होते. त्यांच्यामुळे मराठा व ब्राम्हण या दोन्ही समाजामध्ये नाहक तेढ निर्माण झाली आणि महाराष्ट्रातील जाती-धर्मामध्ये असलेले सलोख्याचे वातावरण विनाकारण गढूळ बनले.
राम गणेश गडकरींची ओळख 'महाराष्ट्राचे शेक्सपियर' म्हणून करून दिली जाते. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्याप्रभाव, भावबंधन अशी एकापेक्षा एक सरस नाटके लिहून त्यांनी मराठी साहित्यसृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ संभाजी उद्यानात त्यांचा पुतळा बसवण्यात आला होता. राम गणेश गडकरींच्या कर्तुत्वाविषयी कोणतीही माहिती नसताना आमदार नितेश राणेंनी एका मेळाव्यात त्यांच्याविषयी गरळ ओकताना मराठा समाजातील तरुणांना चिथावणीखोर आवाहन केले की, "संभाजी उद्यानात बसवलेला राम गणेश गडकरींचा पुतळा जो कुणी उखडून काढेल त्याला पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल." त्यांच्या या जाहीर आवाहनानंतर पेटून उठलेल्या चार मराठा तरुणांनी संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला. आमदार नितेश राणेंनी त्या चारही माथेफिरू तरुणांचा पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊन जाहीर सत्कार केला आणि या घृणास्पद कृत्याचे समर्थन केले. अशा प्रकारे आमदार नितेश राणेंच्या जातीद्वेषापोटी राम गणेश गडकरींसारख्या एका महान साहित्यकाराला मरणोत्तर नाहक अवहेलना स्वीकारावी लागली.
दोन वर्षापूर्वी शरद पोंक्षेनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हे राम नथुराम’ नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. अर्थातच अशा प्रकारे नाटकातून पंडीत नथुराम गोडसे यांच्यासारख्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेक-याचे उदात्तीकरण करणे योग्य की अयोग्य हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मुळात भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा अलंकार आहे. याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याने कुणा शरद पोंक्षेना आपल्या नाटकाच्या माध्यमातून पंडीत नथुराम गोडसेंची बाजू समाजासमोर मांडण्याचा अधिकार भारतीय संविधानानेच त्यांना बहाल केलेला आहे. शरद पोंक्षे आपल्या नाटकातून नेमकी कोणती भूमिका मांडतात हे प्रत्यक्ष नाटक पाहून त्यावर आपली मत-मतांतरे व्यक्त करण्याचा अधिकार सर्वसामान्य प्रेक्षकांना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यभर गाजत असलेल्या ‘हे राम नथुराम’ नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. तेव्हा कोणत्याही परिस्थीतीत शरद पोंक्षेना नाटकाचे प्रयोग करू देणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणेंनी दिली. त्यांच्या धमकीमागे पंडीत नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यांचे नाटकातून उदात्तीकरण होतेय हे जरी वरकरणी कारण असले तरी त्यांच्या या भूमिकेमागेही नितेश राणेंचा ब्राम्हणद्वेष ठासून भरला होता. पंडीत नथुराम गोडसे व शरद पोंक्षे हे दोघेही जातीने ब्राम्हण आहेत आणि ‘हे राम नथुराम’ नाटकाला विरोध करून आपण ब्राम्हणद्वेष समाजात आणखीन जोमाने पसरवू शकतो. त्यासाठी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला. शेवटी जिल्ह्यातील शिवसैनिक नाटकाच्या समर्थनार्थ नाट्यगृहाकडे जमा झाले आणि चोख पोलीस बंदोबस्तात ‘हे राम नथुराम’ नाटकाचा प्रयोग पार पडला. ब्राम्हण समाजाचा द्वेष केला तर आपण मराठा समाजाचे राज्यस्तरीय नेते होऊ शकतो, या अपेक्षेनेच नितेश राणेंनी ब्राम्हण समाजाविरोधात राज्यभरात सर्वत्र गरळ ओकली. त्यामुळे काही माथेफिरु चांडाळ चौकडी त्यांच्या अवती-भोवती गोळा झालीही असेल परंतु सुज्ञ मराठा समाजाने त्यांचे नेतृत्व कधीही स्वीकारले नाही. क्रांतीदिनी मुंबईतील मराठा मोर्चादरम्यान आमदार नितेश राणे जेव्हा व्यासपीठावर चमकोगिरी करायला गेले, तेव्हा मराठा बांधवांनीच त्यांचा हुर्यो उडवला व त्यांना त्याठिकाणी जाब विचारला. मराठा बांधवांनीच त्यांचे नेतृत्व धुडकारून लावले. एखाद्या समाजाचे राज्यव्यापी नेतृत्व करण्यासाठी भरीव कार्य करावे लागते, खचता खाव्या लागतात, त्या समाजाचे प्रश्न प्राधान्याने घेऊन सर्वस्व झोकून देत लढावे लागते. त्यावेळी कुठे तो समाज त्या व्यक्तीला आपला नेता म्हणून स्वीकारतो. दुस-या समाजाविरोधात गरळ ओकली व द्वेष केला म्हणून आपल्या समाजाचे नेते बनता येत नसते, ही गोष्ट नारायणराव राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या चिरंजीवांना शिकवायला हवी होती.
भारतीय जनता पक्षाचा उल्लेख हा 'पार्टी विथ डिफरन्स' असाच केला जातो. अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्याची परंपरा सांगणारा हा पक्ष आहे. नारायण राणेंना व त्यांच्या दोन्ही पराक्रमी पुत्रांना भाजप पक्षात प्रवेश देण्याआधी ही गुंडप्रवृत्तीची राडेबाज मंडळी भाजपच्या मूलभूत विचारसरणीला धरून भविष्यात काम करतील का, याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील खास करून पुणे जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाने भाजप अगदी विरोधी पक्षात असताना सुद्धा मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान केले होते. आज ब्राह्मणांविरोधात विखारी भाषेत गरळ ओकणा-या नितेश राणेंसारख्या विकृत नेत्याला भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश दिला तर भाजपची नेतेमंडळी त्या ब्राह्मण समाजातील मतदारांना कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहे...? भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून गेली वर्षानुवर्षे भाजपच्या उमेदवारांना मतदान केलेल्या ब्राह्मण समाजाचा हा पक्षाने केलेला विश्वासघात नव्हे का...?? त्यांच्या भावभावनांशी पक्षाने केलेला हा खेळ नव्हे का...??? आमदार नितेश राणेंसारख्या जातीद्वेषाने पछाडलेल्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देणे म्हणजे पक्षाच्या मूलभूत विचारसरणीला तिलांजली देण्यासारखेच आहे. राजकारणात मतांची गोळाबेरीज महत्वाची असते. आजच्या काळात राणे कुटुंबियांसाठी पक्षाच्या विचारसरणीला तिलांजली द्यावी एवढे खरोखरच ते राजकारणात महत्वाचे राहिले आहेत का...? अजिबात नाही...! आज नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. नारायण राणेंचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाला आहे तर त्यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत दोन वेळा दारुण पराभव झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर १ लाख ७८ हजारांच्या मताधिक्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेने नारायण राणेंना व त्यांच्या दोन्ही पुत्रांना लाथाडले आहे. दत्ता सामंत, सतीश सावंत, गोट्या सावंत, संजू परब अशी मोजकेच शिलेदार आज राणेंपाशी उरले आहेत. त्यातील सतीश सावंत भाजपमध्ये व संजू परब शिवसेनेत प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हे दोन्ही प्रवेश झाले तर कणवलीत आमदार नितेश राणेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन नारायण राणेंचे उरलेसुरले अस्तित्व संपुष्टात येऊन त्यांचे राजकीय दुकान कायमचे बंद होईल. याउलट नारायण राणेंचा पक्ष भाजपने विलीन करून घेतला तर शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचा पक्षप्रवेश रोखून ठेवला आहे. भाजपने नारायण राणेंचा पक्ष विलीन करून घेतला तर शिवसेना छगन भुजबळांना पक्षप्रवेश देणार हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख आहे. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते होते आणि आजही माळी समाजासोबत ओबीसी समाज त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळ हे ईडीच्या चौकशीत तुरुंगात असल्यामुळे त्यांचा प्रभाव थोडासा कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. शिवाय भुजबळ यांनी शिवसेनेतुनच राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली असल्याने एकेकाळच्या या जुन्या शिवसैनिकाला पुन्हा एकदा शिवसेनेची साथ मिळाली तर नाशिक जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यास फारसा वेळ लागणार नाही. राजकीय गोळाबेरजेच्या दृष्टीने विचार केला असता तुलनात्मकदृष्ट्या छगन भुजबळ हे आजही नारायण राणेँपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत. अशा वेळी नारायण राणेंच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करून छगन भुजबळांना शिवसेना प्रवेश करण्यासाठी मोकळे रान देणे हा भाजपसाठी 'घाटे का सौदा' ठरेल यात कुणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही.
दोन महिन्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यावर चिखलफेक करून आपल्या गुंडप्रवृत्तीचा उत्तम नमुना महाराष्ट्रासमोर पेश केला होता. चिंटू शेखवर गोळ्या झाडणारे आणि गोव्यात जाऊन टोलनाक्याची तोडफोड करणारे नितेश राणेच होते. नारायण राणेंचे थोरले चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी तीन वर्षांपूर्वी संदीप सावंत या आपल्याच कार्यकर्त्याला गाडीत कोंबून मारहाण करत मुंबईमध्ये नेले. तिकडे अंधेरीतील एका इमारतीमध्ये त्यांना डांबून लाठ्या-काठ्या, लोखंडी सळ्यांनी अतिशय अमानुषपणे मारहाण केली. स्वतःसहित आपल्या दोन्ही पुत्रांचा इतिहास गुंडगिरीचा असताना नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्ष हा दलाल व गुंडांचा पक्ष आहे. उद्या दाऊद सुद्धा अटक होईल आणि भाजपात प्रवेश करेल, असे अपमानास्पद वक्तव्य केले होते. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीपायी गेली वर्षानुवर्षे खचता खाणा-या निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनावर राणेंच्या या वक्तव्यामुळे खूप खोलवर जखमा केल्या व या जखमा कधीही न भरणा-या अशाच होत्या. आज त्याच नारायण राणेंचा पक्ष भाजपने विलीन करून घेतला तर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनावर झालेल्या त्या जखमांवर मीठ चोळल्या सारखे होईल. नारायण राणेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यास त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करण्यापेक्षा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणे केव्हाही पसंत करतील. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यापुर्वी स्वच्छ प्रतिमेच्या व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला विचारणे अतिशय गरजेचे आहे.
*"भारतीय जनता पक्षाला दलाल व गुंडांचा पक्ष म्हणून हिणवणारे नारायण राणे त्यांना चालतील का...? संदीप सावंतांना डोके फुटेस्तोवर अमानुषपणे मारहाण करणारे निलेश राणे त्यांना चालतील का...? महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना 'बाब्या' म्हणून हिणवत त्यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याची धमकी देणारे आमदार नितेश राणे त्यांना चालतील का...? पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरुस्थानी मानतात त्या संभाजी भिडेंना 'भिड्या' म्हणून हिणवणारे आमदार नितेश राणे त्यांना चालतील का...? महाराष्ट्राचे शेक्सपिअर असलेल्या राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यासाठी चिथावणीखोर भाषण देणारे व पुतळा पाडणा-या माथेफिरुंचा पाच लाखांचे बक्षीस देऊन जाहीर सत्कार करणारे आमदार नितेश राणे त्यांना चालतील का...? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ब्राम्हण समाजाने गेली वर्षानुवर्षे भाजप पक्षावर व विचारसरणीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला त्या ब्राह्मणांच्या द्वेषाने पछाडलेले आमदार नितेश राणे त्यांना चालतील का...?" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधतील व गुंडप्रवृत्तीच्या राणे पितापुत्रांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण न करता पक्षाची 'पार्टी विथ डिफरन्स' ही प्रतिमा यापुढेही अबाधित राखतील.*